You are currently viewing महाराष्ट्रात आढळले करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण

महाराष्ट्रात आढळले करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण

मुंबईत पाच, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर येथे प्रत्येकी एक जणांचा समावेश

मुंबई :

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

“ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

ब्रिटन मधून भारतात परतलेल्या या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये नव्या कोरोना आजाराचे विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिरा भाईंदर येथील एक जण २१ डिसेंबर रोजी ब्रिटन मधून भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर तो आपल्या पत्नीसह गृह विलगीकरणात रहात होता. मात्र राज्य शासनाकडून ब्रिटन मधून आलेल्या नागरिकांची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेमार्फ़त या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवालात हा रुग्ण नव्या कोरोना आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले तातडीचे निर्देश

ब्रिटन येथील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणा-या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाइन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात आले आहे मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवर क्वारंटाईन करावे, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

दरम्यान, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणा-या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच कोरोना लसीकरण करावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षम संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + three =