*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*श्री स्वामी प्रकट दिन*
!! उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर
आले…
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच
श्रीपाद…
अंबा भवानीचा तूच नरहरी,
आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी
अशक्य ही सारे करीती शक्य एक
क्षणात…
“भिऊ नकोस मी पाठीशी आहे” असे
सदा सांगे आम्हास…!!
*श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार*
!! सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज…’!!
इ.स. १४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली..
ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज…!
आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले…!
गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करत करत सोलापुरास ते आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासविले परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करत राहतील…
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या… अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन…
पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना…!!
”अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”
” अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ”
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी—- ठाणे@
9870451020
