You are currently viewing परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यास आजपासून सुरूवात

परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यास आजपासून सुरूवात

​कणकवली :

योगियांचे योगी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा ​११७ वा जन्मोत्सव सोहळा शनिवार ​३० जानेवारी ते बुधवार ​३ फेब्रुवारी ​२०२१ या पाच दिवसांच्या कालावधीत साजरा होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यात सर्व धार्मिक विधी होणार आहेत, मात्र महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि जन्मोत्सव सोहळा दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जात असे. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कमिटीने जन्मोत्सव सोहळा यावर्षी साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी पुण्यतिथी सोहळा देखील साधेपणानेच साजरा करण्यात आला होता. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ​३० जानेवारी ते ​२ फेब्रुवारी या कालावधीत पहाटे ​५.​३० वा. समाधीपूजन, काकड आरती तसेच भक्तांच्या कल्याणार्थ ‘परमहंस भालचंद्र मन्युसुक्‍त याग’ हा धार्मिक विधी प्रख्यात ब्रह्मवृदांकडून सकाळी ​८.​३० ते ​१२.​३० यावेळेत होणार आहे. दुपारी ​१२.​३० वा. बाबांची महाआरती, दु. ​१ ते सायंकाळी ​७ वा. पर्यंत भजने, सायंकाळी ​७ वा.धुपारती, रात्रौ ​८ वा. बाबांची दैनंदिन आरती होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ​१०.​३० ते ​१२.​३० यावेळेत श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. तर मंगळवार ​२ फेब्रुवारी रोजी सकाळी ​९ ते ​१२.​३० यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून ​११७ रक्तदात्यांचा रक्तदान संकल्प करण्यात आला आहे. ज्या भाविकांना या शिबिरात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थानकडे आगामी नावनोंदणी करावयाची आहे.

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ​११७ वा जन्मदिन सोहळा बुधवार ​३ फेब्रुवारी रोजी होणार असून यानिमित्त पहाटे ​५.​३० वा. समाधीपूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी ​८ ते ​९.​३० यावेळेत भजने, सकाळी ​९.​३० ते ​११.​३० यावेळेत समाधीस्थानी लघुरूद्राभिषेक, सकाळी ​९.​३० ते ​१२.​३० या वेळेत जन्मोत्सव किर्तन ह.भ.प. भाऊ नाईक (वेतोरे-वेंगुर्ले), दुपारी ​१२ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांचा ​११७ वा जन्मोत्सव सोहळा, ​१२.​३० वा. आरती, दुपारी ​१ ते सायंकाळी ​५ यावेळेत भजने आणि सायंकाळी ५ वा. संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादित उपस्थितीत पालखी मिरवणूक होणार आहे. रात्रौ ​८ वा. दैनंदिन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जन्मोत्सव सोहळ्यास येणार्‍या भाविकांनी कोरोना संदर्भात शासकीय नियम व शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात व समाधी स्थानी मास्क लावून तसेच योग्य अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. जन्मोत्सव सोहळ्यास येणार्‍या भाविकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन संस्थानच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + fifteen =