You are currently viewing सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत

सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत

*सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती*

*उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना विचारला जाब*

*आरोपी अटक न झाल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा*

राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावडाव गावातील सामाजिक कार्यकर्त्या नयना सावंत यांना मारहाण करून विनयभंग केला तसेच त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला या घटनेला ५ दिवस उलटले तरी देखील अद्यापर्यंत कणकवली पोलिसांनी राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केलेली नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने सावडाव मधील ग्रामस्थांसमवेतआज कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना याबाबत जाब विचारला. पोलिसांच्या कारभाराची लक्तरे यावेळी काढण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक करा, जिल्ह्याची बदनामी होत आहे. अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांना दिला.

वैभव सावंत व नयना सावंत दाम्पत्याला मारहाण करणारे राणे समर्थक दत्ताराम काटे हे मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक का करण्यात आली नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? सावंत दाम्पत्याला अमानुषपणे मारहाण होऊन देखील पोलिसांनी दत्ताराम काटे व अन्य जणांच्याविरोधात ३०७ कलम का लावले नाही? अशी विचारणा शिवसेनेच्या नेत्यांनी केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांनी सावंत यांना किरकोळ जखम झाली असल्याबाबतचा वैद्यकीय अहवाल आल्याचे सांगितले. गुप्तांगावर गंभीर जखम होऊनही किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात आल्याने वैभव नाईक शिवसेना पदाधिकारी यावेळी चांगलेच संतप्त झाले. वैभव सावंत मरता मरता वाचले आहेत मात्र पोलिसांना हे प्रकरण लफादफा करायचे आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

दत्ताराम काटे सापडत नाहीत असे उत्तर श्री आढाव यांनी दिल्याने कणकवली पोलीस स्टेशन मध्ये दत्ताराम काटे येऊन गेले. तेव्हा त्यांना का पकडण्यात आले नाही. कणकवलीतील एका वकीलाकडे देखील अटकपूर्व जामिनासाठी दत्ताराम काटे येऊन गेले ते आम्हाला कळाले मग पोलिसांना का कळाले नाही. पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बीड करायचा आहे का? सावंत दाम्पत्याला पोलीस न्याय केव्हा मिळवून देणार? महिलांच्या सुरक्षेसाठी ११२ डायल सेवा व दामिनी पथके स्थापन केली आहेत. सावडाव मारहाणी वेळी देखील ११२ वर तक्रार करण्यात आली होती मात्र पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही. पोलिसांकडून महिलांना खरोखरच न्याय मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे होत राहिले तर ११२ वर कोणच तक्रार करणार नाहीत. जिल्ह्यात पुन्हा राजकीय दशहत वाढू लागली आहे ही दहशत पोलीस मोडीत काढणार आहे की नाही नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे. अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी व सावडाव ग्रामस्थांनी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यावर केली.
सावंत दाम्पत्याला मारहाण करणारे मोकाटपणे फिरत आहेत, हे पोलिसांचे अपयश आहे, दत्ता काटे व अन्य जणांनी गावात दहशत माजवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सावंत दाम्पत्याला कशाप्रकारे अमानुषपणे मारहाण केली याची वसुस्थिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या ग्रामस्थांनी कथन केली. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावापोटी याप्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सावडाव ग्रामस्थांनी केला. सावडावातील पोलीस पाटील काही कामाचा नाही, त्याची आरोपींना साथ आहे त्यांच्यावर देखील कारवाई करा असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.

सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणातील आरोपींवर ३०७ कलम लावून त्यांना तात्काळ अटक करावी,अन्यथा दोन दिवसांत शिवसेनेकडून कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावर याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन श्री आढाव यांनी दिले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख डाॅ. प्रथमेश सावंत, राजू राठोड, बंडू ठाकूर, संदीप कदम,महेश कोदे, वैदेही गुडेकर,माधवी दळवी, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, रुपेश आमडोसकर, तेजस राणे, गुरू पेडणेकर,सिद्धेश राणे,रोहित राणे, आबू मेस्त्री पराग म्हापसेकर आदींसह शिवसैनिक व सावडाव ग्रामस्थ सुलक्षणा नरसाळे, सुनीता वारंग, नम्रता नरसाळे, वनिता मेस्त्री, सुर्वणा तेली, सुरेखा मोरे, जयवंत वारंग, संतोष तेली, अजय जाधव, संदीप वारंग, सुरेश मोरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा