You are currently viewing इचलकरंजीत गटारीचे सांडपाणी तुंबून नागरिकांचे आरोग्य धोक्यात

इचलकरंजीत गटारीचे सांडपाणी तुंबून नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

गटार दुरुस्त करण्याची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

 

 

इचलकरंजी: प्रतिनिधी

 

इचलकरंजी शहरात महालक्ष्मी नगर येथील गटारीतील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाठणी तुंबून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.तरी सदर गटारींची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी भागातील नागरिकांनी केली. तसेच सदर मागणीचे निवेदन भाजपा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. पुनम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे गटारींची झालेली दुरवस्था आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेल्या आरोग्याची भीषणता महापालिका प्रशासनाला दाखवून दिली.

महालक्ष्मी नगर येथे गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे याठिकाणी साथीचे आजार वाढत असून परिसरात ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला या साथीच्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेंगी, मलेरियाने तर नागरिक हैराण झाले आहेत.अशी विदारक स्थिती असताना महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये येणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत गटाराचीहे काम अर्धवट आहे. सध्या या परिसरामधील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने गटार पूर्ण भरून ते पाणी चेंबरमधून बाहेर येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर वहात आहे. विशेष म्हणजे गटारीच्या मुख्य रस्त्यावर हे सांडपाणी साचल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने गटार दुरुस्त करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली आहे.

सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. घरातून बाहेर पडताच गटारीच्या पाण्यातून जावे लागते. शाळकरी मुले यातूनच जातात. पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास, सर्वत्र घाण यामुळे अनेक जण आजारी पडले आहेत. याबाबत तक्रार केली की तात्पुरती उपाययोजना करत आरोग्य विभागाकडून केवळ साफसफाई केली जाते.त्यामुळे तात्काळ गटार दुरुस्तीचे टेंडर काढून कायमचा मार्ग काढावा, अशी मागणी केली. यावेळी लवकरच टेंडर काढून गटारीचे काम करण्याचे आश्वासन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिले.

आज महापालिकेच्या सफाई बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी अक्षरशः बादलीने गटारीतील पाणी काढून सफाई करत होते. या वेळी भागातील नरेंद्र बगरेचा, संजय खोत, प्रकाश जाधव,सागर कुंभार, शिवाजी चौथे, गणेश पाटील, आनंदा मस्के, शंकर इनामदार,रशिद शेख,सुनिल आमने,सावकार गोसावी, महेबुब शेख, रियाज अन्सारी, सौ. जाधव, सौ. पाटील,सौ.खोत ,सौ. पाटील व भागातील नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा