सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ; कोकणच्या विकासाला नवी चालना
पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत ‘सिंधुरत्न समृद्ध’ या महत्वाकांक्षी योजनेला पुढील तीन वर्षांची मुदतवाढ जाहीर केली. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.
या मुदतवाढीसाठी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मुख्यमंत्री यांनी यास हिरवा कंदील दिल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ‘सिंधुरत्न समृद्ध’ ही पथदर्शी योजना राबविण्यात आली होती. मात्र, ३१ मार्च २०२५ रोजी या योजनेची मुदत संपली होती.
योजनेला पुढेही सुरू ठेवण्याची जिल्हावासीयांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत या योजनेला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेअंतर्गत कृषी, फलोत्पादन, पशुधन विकास, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, ग्रामविकास, लहान बंदरांचा विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित सूक्ष्म उद्योग तसेच कौशल्य विकास या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे या योजनेच्या मुदतवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
