You are currently viewing वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कणकवलीत शिवसेनेकडून निषेध मोर्चा

वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कणकवलीत शिवसेनेकडून निषेध मोर्चा

वारकऱ्यांच्या वेशात विठू नामाचा जयघोष करीत केली निदर्शने*

*कारवाईसाठी तहसीलदारांना दिले निवेदन*

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसील कार्यालयावर सोमवारी सायंकाळी धडक निषेध मोर्चा काढण्यात आला. डोक्यावर सफेद टोपी, हातात टाळ, भगवे झेंडे, निषेधाचे फलक आणि विठू नामाचा जयघोष करीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते तहसील कार्यालय पर्यत हा मोर्चा काढण्यात आला. वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, खोके सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.याप्रसंगी संबंधितांवर कारवाईसाठी तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले हजारो वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने येतात. याचवेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.शुल्लक गोष्टीवरून लाठीमार करण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. याचा आम्ही निषेध करतो. खरंतर कोरोनाच्या कालावधीत यात्रा सुरू राहिल्या पाहिजेत यासाठी उद्धवजींनी वारकऱ्यांना अभिप्रेत असे काम केले. कुठल्याही वारकऱ्यांना त्रास होऊ न देता काम केले होते. आज हिंदुत्ववादी सरकार म्हणून जे सांगत आहेत त्यांनीच वारकऱ्यांवर लाठीमार करावयास लावले. याचा निषेध म्हणून हे आंदोलन आम्ही करत आहोत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्र देखील तीव्र स्वरूपात हे आंदोलन केले जाणार आहे.


संदेश पारकर म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाने जे लोक मत मागत आहेत त्यांच्याकडूनच राज्याच्या जनतेवर अन्याय अत्याचार करण्याचे काम सुरू आहे. कुठलाही घटक या राज्यांमध्ये सुरक्षित नाही . वारकऱ्यांना सुद्धा या सरकारने सोडले नाही. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.खरंतर हा सगळ्या वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हे निर्दयी राज्य सरकार आहे. गेल्या वर्षभरामध्ये प्रत्येक वर्गाला, प्रत्येक घटकाला या सरकारने त्रास दिलेला आहे. आज महागाई असेल बेरोजगारी असेल सिलेंडर दरवाढ असेल या सगळ्याला जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून जितका निषेध करता येईल तेवढा थोडा आहे. जी चुकीची माणसं सत्तेवर बसलेली आहेत या लोकांना सत्तेवरून खाली खेचण्याचे काम जनतेने करावे असे त्यांनी सांगितले.

सतीश सावंत म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वारकऱ्यांना लाठीमार होण्याची पहिली वेळ आहे. माऊलीच्या भक्तांना सुद्धा आज या महाराष्ट्रामध्ये जगण्याचा अधिकार राहिलेला नाही. ज्यांनी ज्यांनी लाठी हल्ला केला त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नाही तर भविष्यात शिवसेनेकडून मोठे जनआंदोलन केले जाईल असे सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले,सचिन सावंत, राजू राणे,माजी नगरसेवक कन्हैया पारकर, सुजित जाधव, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, आरपीआयचे तानाजी कांबळे, मजदूर संघ संचालक जयेश धुमाळे, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, बाळू मेस्त्री, रुपेश आमडोस्कर, तालुका प्रमुख वैदही गुडेकर, दिव्या साळगावकर,युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे,बंडू ठाकूर,मंगेश सावंत, राजू राणे, प्रसाद अंधारी, अनुप वारंग, वैभव मालंडकर, ललित घाडीगावकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, निसार शेख, संतोष परब,सिद्धेश राणे,गौरव हर्णे,सुदाम तेली, रोहित राणे, प्रवीण वरुणकर, सचिन खोचरे, नितेश भोगले,प्रसाद राणे,श्री. गावकर,लक्ष्मण हन्नीकोड, संदीप गावकर,सचाभाई आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − one =