You are currently viewing रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लावू:खा.राऊत

रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लावू:खा.राऊत

सावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं काम रखडले आहे. फेज-वनच काम होऊन फेज-टूच काम पूर्ण झालेल नाही. ते मार्गी लागून रेल्वे टर्मिनस सुरु व्हावं व या ठिकाणी महत्वाच्या एक्सप्रेस रेल्वेंना थांबा देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू तथा रोट्रॅकचे अध्यक्ष मिहिर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत केली आहे. याप्रसंगी रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते काम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वच गाड्या थांबतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

२४ जून २०१६ रोजी सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटन झाले. फेज वन या कामाची पुर्ण सुरुवात व काम पूर्ण झाले‌. पण, फेज-टूचे रखडलेले काम गेल्या ५-६ वर्षे बंदच आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सावंतवाडीकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल. यासोबतच सावंतवाडी स्टेशनवर रोजच्या ९ व आठवड्याला धावणा-या ४-५ अशाच रेल्वे गाड्या थांबतात. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवासी वर्गाला खूप मोठ्या गैरसोयीची अनुभूती येते. मुंबईला जायचे म्हटले तर सावंतवाडी स्टेशनवर ५-६ गाड्यांचेच पर्याय प्रवाशांना मिळतात. त्यातील अर्धे सिट हे रिझर्व कोटयांकडे असल्यामुळे जनरल कोट्यांमध्ये तिकीट मिळणे कठीण होऊन बसते.जवळच्या तालुक्यांतील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबवल्या जातात यामुळे तेथील नागरीकांची गैरसोय होत नाही. पण सावंतवाडीतील नागरीकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. सावंतवाडी तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी हल्लीच जनशताब्दी सारख्या वेगवान रेल्वेलाही सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर थांबा देण्यात आला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती. पण आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व सावंतवाडीचा जोमाने होणारा विकास बघता आत्ताच्या काळात व आगामी काळात ज्यादा रेल्वेगाड्या नक्कीच उपयोगी ठरतील. कोकणातील विकास व कोकणी लोक यांच्यासाठी कोकणरेल्वेच एक सेतू आहे जो देशातील इतर बाबींशी जोडला जातो. गणेश चतुर्थी, जत्रा इ.सणांसाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. तरीही गर्दी ही रोज येण्या-या गाड्यांमध्येच असते. याचे कारण लोकांना मिळणारे पर्याय, त्यामुळे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांची होणारी बरीच गैरसोय टळेल व सावंतवाडी टर्मिनसमुळे येथील जनतेला नक्कीच सगळ्या बाबतींमध्ये बराच फायदा होईल.आजतागायत मा.कै.प्रा.मधु दंडवते ,कै.जयानंद मठकर, कै.जॉर्ज फर्नांडिस, कै.बॅ. नाथ पै या सारख्या दिग्गज नेत्यांनी तसेच आताच्या समाज सेवकांनी सावंतवाडी स्टेशन व टर्मिनससाठी बरच काही केले आहे. त्यामुळे रेल्वे टर्मिनस सुरु करावं व महत्वाच्या एक्सप्रेस रेल्वेंना थांबा देण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांना केली.यावेळी भावेश भिसे ,साहिल नाईक, प्रणय गावडे, रौनक रेडीज, विहंग गोठोस्कर, प्रोजेक्ट चेअर सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा