You are currently viewing नेमळे गावातील ग्रामस्थांचा महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तीव्र आंदोलनचा इशारा

नेमळे गावातील ग्रामस्थांचा महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तीव्र आंदोलनचा इशारा

सावंतवाडी :

झाराप पत्रादेवी बायपासवर होत असलेले अपघात हे महामार्ग बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने महामार्ग बनवल्याने होत असून रस्ता क्रॉस करण्यासाठी बनविण्यात आलेल्या बॉक्सिंग पर्यंतचे सर्विस रोड आठ दिवसात तयार करावेत तसेच अपघात न होण्याच्या दृष्टीने इतर उपाय योजनाही कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नेमळे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला. दोन दिवसांपूर्वी महामार्ग लगत पादचाऱ्याला कारने धडक दिल्याने त्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर सलग दोन दिवसांत दोन अपघात झाले. यात नेमळेतील युवक जागीच ठार झाला. तर एका महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. या महामार्गावर वारंवार अपघात होतात याला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार आसल्याचा आरोप करत सोमवारी २९ मे रोजी नेमळे ग्रामपंचायत कार्यालयात नेमळे शेतकरी ग्रामस्थ यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश खटी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यानी उपअभियंता यांना धारेवर धरत हा महामार्ग बेजबाबदारपणे निष्काळजीपूर्वक बनवून आमची फासवणूक करण्यात आली आहे. या हायवेवर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बाॕक्सेलमधून पलीकडे जाण्यायेण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात आले असते तर आज किती तरी जणाचे प्राण वाचले असते, असा आरोप केला. यासाठी आम्ही नेमळे ग्रामस्थ आठ दिवसाची मूदत देत असून आठ दिवसात बाॕक्सेलपर्यंत जाण्या येण्यासाठी सर्व्हिस रोड, तसेच सर्कलवर दिशा दर्शक चिन्हाचे फलक , तसेच गॕस पाईप लाईन साठी खोदाई करून धोकादायक करण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास नेमळेतील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन हायवेवर रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता महेश खटी यांच्यासह सावंतवाडी पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे, सेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, महामार्गचे अभियंता साळुंखे, शाखा अभियंता कांबळे, नेमळे सरपंच दिपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक चौहान, तलाठी पाटोळे तसेच नेमळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =