You are currently viewing राज्य शासनाचा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा..

राज्य शासनाचा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा..

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती

 

सिंधुदुर्गनगरी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांचे १२ कोटी ७४ लाख ८६ हजार कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय सहकार मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. पालकमंत्री मा. रविंद्र चव्हाण साहेब, आमदार नितेश राणे, राजन तेली, अतुल काळसेकर व आपल्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

काल मुंबई मंत्रालयात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात ही बैठक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्च २०१६ अखेर पात्र ठरलेल्या ७५६४ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे हे कर्जदार शेतकरी अडचणीत आले होते व बँकेचे थकबाकीदार बनले होते. याबाबत आमदार नितेश राणे यांनी मंत्रालय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर व आपण बँकेच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. बुधवारी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात ही बैठक झाली व शेतकऱ्यांचा रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला असे मनिष दळवी यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जिल्ह्यातील १६७ विविध कार्यकारी संस्थांमार्फत हे कर्ज वितरण केले होते. गेले अनेक वर्ष विकास संस्थांचे हे कर्ज थकीत राहिल्यामुळे या विकास संस्था ही अडचणीत आल्या होत्या. सहकार मंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या या थकीत कर्जाचा प्रश्न मार्गी लागला आहे, व विकास संस्थांचाही प्रश्न यातून सुटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ३१ मार्च २०१६ अखेरील पात्र ठरलेल्या ७५६४ शेतकऱ्यांची यादी निश्चित झाली होती. व तेवढ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्ज थकीत राहिल्यामुळे त्यावरील व्याजही वाढले असून हा प्रश्न बँकेसमोर आता निर्माण झाला आहे. व्याजाची काही तोडगा काढण्याचाही प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील शेतकरऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व्यक्त केेलेत.

दरम्यान बुधवारी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्या उपस्थितीत सिंदूर जिल्ह्यातील या कर्जमाफी बाबत महत्त्वाची बैठक झाली. अन्याय झालेल्या या शेतकऱ्यांच्या बाजूने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांनी भूमिका मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद सहकार मंत्र्यांनी दिला. या कर्जमाफीचा अंतिम निर्णय झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा