You are currently viewing काजू बीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन…

काजू बीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन…

काजू बीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन…

प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर होणारा आंदोलन: सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघाची पत्रकार परिषदेत माहिती..

बांदा

कोकणातील काजू बी ला किमान २०० रुपये हमीभाव मिळावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा. तसेच काजू गरावर २० टक्के हून अधिक आयात शुल्क आकारावे, या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी संबंधित तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन छेडणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघाची पत्रकार परिषद बांदा येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी धरणे आंदोलनाची माहिती दिली. यावेळी नितीन मावळणकर, सुरेश गावडे, सदाशिव गाड, नितीन सावंत आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी विलास सावंत म्हणाले, काजू हे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वीस वर्षात मजुरी १० पट, खतांच्या किमती १३ पट वाढल्या. मात्र काजू बीचा दर दुप्पट सुद्धा झाला नाही. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे.
काजू बी ला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाभरात गावोगावी काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या नियोजन बैठका होत आहेत. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धरणे आंदोलनात सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादक संघटना, काजू समूह गोपुरी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना आणि शेतकरी संघ दोडामार्ग या संघटना सामील होणार आहेत.
तसेच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका सरपंच संघटना, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ या संस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. काजू बी ला हमीभाव मिळावा या मागणीसाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा