You are currently viewing आंगणेवाडीप्रमाणे कुणकेश्वरची कामे का केलेली नाहीत..? रस्त्यांना पडलेल्या खड्डयांना जबाबदार कोण..?

आंगणेवाडीप्रमाणे कुणकेश्वरची कामे का केलेली नाहीत..? रस्त्यांना पडलेल्या खड्डयांना जबाबदार कोण..?

परशूराम उपरकर यांचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सवाल…

कणकवली :

आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी आपण जी कामे केलीत ती कामे योग्य असून पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, याची हमी आपण देणार का ? असा सवाल मनसे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना केला.

आंगणेवाडीची कामे झाली तशी कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची कामे का केली नाहीत? असा सवाल करत आपण फेसबुकला ज्या पोस्ट करता त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली आहे का? अशी विचारना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.

परशूराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने श्री. सर्वगोड यांची भेट घेऊन चर्चा केली. आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी जी कामे करण्यात आली ती कामे पूर्ण झालेली नाहीत तसेच ती योग्य दर्जाची ही नाहीत याकडे लक्ष वेधले असता एक काम पूर्ण झाले आहे बाकीची कामे पूर्ण होणे बाकी असल्याचे कार्यकारी अभियंत्यानी सांगितले. निकषानुसार कामे झालेली नाहीत त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडल्यास जबाबदार कोण? खड्डे पडणार नाही त्याची हमी आपण घेता का असा सवालही यावेळी करण्यात आला. खड्डे पडल्यास ठेकेदाराच्या डीएलपी कालावधीत त्यांच्याकडून ही कामे करून घेतली जातील असे श्री. सर्वगोड म्हणाले.

तसेच कोकणात पाऊस जास्त पडत असल्याने खड्डे पडतात असे त्यांनी सांगताच आपण गोव्यातील कामे जाऊन पाहूया असे उपरकर यांनी सांगितले.

आपण चांगल्या प्रकारे काम करता व त्याची फेसबुकवर प्रसिद्ध करत आहात. सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता पदभार मिळाल्यानंतर आपण खुर्चीच्या पाया पडलात. या साऱ्याची प्रसिद्धी आपण फेसबुक वरून करता त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली आहे का? असा सवालही उपरकर यांनी केला. प्रसाद गावडे यांनी सोनवणे घाट रस्त्यासंदर्भात विचारणा केली. डीगस कडावल रस्त्याच्या खड्ड्यांबाबत काय करणार? असा सवाल केला असता आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतो असे कार्यकारी अभियंत्यानी सांगितले.

कुणकेश्वर कोकणची काशी असून तेथील ही कामे व्हायला हवीत मात्र त्या संदर्भात आपण काय केले? आपण पालकमंत्र्यांकडे जाऊन कामे मंजूर करून आणता ही आनंदाची गोष्ट आहे. पण कुणकेश्वरची कामे का आणली नाहीत ? आमदार नितेश राणेंचा मतदारसंघ म्हणून ही कामे मंजूर झाली नाहीत का ? असा सवाल श्री. उपरकर यांनी केला.

यावेळी मनसेचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनलेकर, राजेश टंकसाळे, अमोल जंगले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा