You are currently viewing मकर संक्रांत:-धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

मकर संक्रांत:-धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*मकर संक्रांत:-*
*धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला मुख्य सण येतो तो म्हणजे *”मकर संक्रांत”….!*
सूर्य एका वर्षात १२ राशीतून भ्रमण करत असतो. पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संपूर्ण भारतात मकर संक्रांत साजरी केली जाते. तामिळनाडू राज्यात यालाच “पोंगल” असेही म्हणतात. तामिळनाडूमध्ये पोंगल सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर आपला मुलगा शनीला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात आणि मकर राशीचा स्वामी शनी असल्याने हा दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो.
मकर संक्रांत सणाचा काळ म्हणजे हेमंत ऋतू…या ऋतूत हवेत अत्यंत गारठा असतो आणि रात्रीच्या वेळी तर हवेतील गारठा वाढतच जातो. पहाटे पहाटे धरणीवर जणू ढग उतरावे तसं धरणीवर शुभ्र धवल धुकं पांघरतं…स्वर्गासारखे भासणारे हे दृश्य पाहून थक्क व्हायला होतं. मकर संक्रांतीच्या वेळी वातावरण आल्हाददायक असतं. हवेतील गारठा… मंद वाहणारा थंडगार वारा आणि शरीरातील उष्णता यामुळे कोमल ओठ फुटतात. पहाटे नाजूक हिरव्यागार गवतावरून सैर करताना पायांना होणारा दवाचा स्पर्श अन् हवेतील गारठ्याने ओठ थरथरतात…दातांवर दात आपटतात… नाजूक कोमल त्वचा शुष्क, कोरडी होते. अशावेळी शरीराला आवश्यकता असते उष्ण अन् स्निग्ध पदार्थांची…म्हणून मकर संक्रांतीच्या सणात तिळगुळ खाण्याची, वाटण्याची प्रथा आहे.
*”तिळगुळ घ्या गोड गोड बोला”*
असं म्हणत कटू आठवणींना विसरून नात्यात गोडवा भरण्याचाही हा एक प्रयत्न…! तीळ आणि गूळ दोन्हीचे गुणधर्म उष्ण…अन् थंडीमध्ये शरीराला असलेली उष्णतेची गरज दोघांच्याही मिलनातून पूर्ण व्हावी म्हणून तर धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तिळगुळ खाण्याची…वाटण्याची पद्धत रूढ झाली…!
*गुळाची तिळाशी भेट व्हावी*
*जिभेवर गोडी गुळाने द्यावी*
*स्नेहाची त्यात कमी नसावी*
*तिळाने ती प्रेमाने पूर्ण करावी*

मुखातील गोडवा कधी कमी न व्हावा…शब्द शब्द गोडीने अखंड भारून जावा… असाच गोडवा मकर संक्रांतीला सर्वांच्या वागण्यात बोलण्यात असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी भारतात अनेक ठिकाणी पतंग उडवून सण साजरा करण्याचीही प्रथा आहे. इमारतींच्या छतावर, माळरानावर, समुद्र किनाऱ्यावर मुले भर उन्हात देखील पतंग उडविताना दृष्टीस पडतात. हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे अनेकदा सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार जडतात. सूर्याच्या उत्तरायणात सूर्यापासून निघणारी किरणे ही माणसाच्या शरीरात औषधी म्हणून काम करतात. त्यामुळे या दिवसात पतंग उडवणाऱ्यांच्या शरीराला नित्य सूर्यप्रकाश मिळतो आणि शरीर निरोगी राहते. अशा शास्त्रीय कारणामुळे मकर संक्रांतीला पतंग उडविले जातात. पतंग उडविण्याच्या प्रथेबद्दल धार्मिक कारण असंही सांगितलं जातं की, त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी आपली भावंडे व हनुमंता सह पतंग उडवला होता, तेव्हापासून ही प्रथा जगभर प्रचलित आहे. प्राचीन भारतीय साहित्य व धार्मिक ग्रंथांमध्येही पतंग उडविण्याच्या प्रथेबाबत उल्लेख आढळतो.
मकर संक्रांती हा एकमेव असा सण असावा ज्या दिवशी काळा कपड्यांचा वापर सुद्धा शुभ मानला जातो. या काळात महिला देखील काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी सुवासिनींनी प्रत्येक घरी जात एकमेकांना वाण देण्याची एक आगळी वेगळी प्रथा आहे. खरंतर सणासुदीला काळे कपडे वर्ज मानले जातात, परंतु मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो. या काळात हवेत असलेल्या थंडीमुळे शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. काळे कपडे उष्णता शोषून घेतात आणि त्वचेला उबदार स्पर्शाची जाणिव करून देतात. या शास्त्रीय कारणामुळे मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आणि घरातील नवीन बाळाला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे. काळ्या कपड्यांवर हलव्याचे दागिने खरोखरच उठून दिसतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या नात्यात… संसारात जन्मभर गोडवा टिकून रहावा म्हणून लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या काळात जप, तप, श्राद्ध, तर्पण, दान, स्नान इत्यादींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने त्याचे फळ शतपटीने मिळते अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. खरं पाहता सूर्य सर्वच राशींवर प्रभाव टाकतो परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीमध्ये प्रवेश अत्यंत फलदायी मानला जातो. सामान्यतः भारतीय पंचांगात सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात परंतु मकर संक्रांती मात्र सूर्याच्या गतीनुसार ठरते.
आयुर्वेदानुसार भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास उशीरही करू नये. कारण जठराग्नी शांत करायचा असेल तर त्याचे अन्न हे त्याला द्यावेच लागते, आणि भूक लागूनही न खाल्ल्यास उद्दीपित झालेला जठराग्नी रस, रक्त आदी धातूंचा नाश करतो. परिणामी थकवा येणे, वजन घटणे यासारखे दुष्परिणाम दिसू लागतात. मकर संक्रांतीच्या आधी येणाऱ्या ऋतूमध्ये सामान्यतः लोकांचा जठराग्नी भल्या पहाटे उद्दीपित होतो असे आयुर्वेदामध्ये म्हटले जाते. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून या ऋतूमध्ये मिळणाऱ्या वांगी, ओला हरभरा, ओले तूर, ओला पावटा, मटार, गाजर यासारख्या भाज्या ज्वारी, बाजरी सारखी धान्य खाण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवसात खाण्यामध्ये तूप, लोणी, तीळ, शेंगदाणे यांचाही वापर सढळ हस्ते व्हायला हवा. हे तेलकट खाणं इतर ऋतूत पचायला जड असलं तरी या ऋतूमध्ये मात्र याचा त्रास होत नाही. त्यामुळे प्रकृती उत्तम राहतेच आणि त्वचेची कांतीही उजळते. वातावरणातील बदलानुसार माणूस आपल्यात बदल घडवून आणतो म्हणून तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला वांगे चुलीत अथवा गॅसवर भाजून वांग्याचे भरीत आणि तीळ घालून केलेली ज्वारीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या प्रत्येक सणांचे एक महत्त्व आहे, त्या ऋतूनुसार, राशीनुसार, जैवविविधतेनुसार सण साजरे केले जातात. म्हणून भारतात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आला भाग्याचा दिन
मकरसंक्रांतीचा सण
पूजा सुगडाची करुनी
देते सौभाग्याचे वाण

नेसली चंद्रकला काळी
वर भरजरी ती किनार
गोऱ्या अंगावर शोभली
साडी ठिपक्यांची नक्षीदार

सुवर्णालंकार शोभिवंत
कंठी हिरेजडित हार
लेणं सौभाग्याचे लेवुनी
दिसे सुंदर देखणी नार

बांगड्या हातात हिरव्या
सुवासीनिंचा असे मान
नथनी नाकात नाजूक
कर्णीयांत कर्णफुले छान

भाळी चंद्रकोर रेखीव
केसांत गजरे माळले
रूप दिसता गोड हासरे
यौवन सौन्दर्यावर भाळले

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − seven =