You are currently viewing आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकवू : हरी खोबरेकर

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकवू : हरी खोबरेकर

मालवण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी गेल्या काही महिन्यांचा काळ संकटांचा गेला तरीही मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने १९ ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. भाजपचा गड असणाऱ्या काही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता मिळविली असून किनारपट्टी भागात भाजपचा सुपड़ा साफ झाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकवू, असा विश्वास तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, सेजल परब, सन्मेष परब, यतीन खोत, शिल्पा खोत, दीपा शिंदे, कोळंब सरपंच सिया धुरी, विजय नेमळेकर, निखील नेमळेकर, शशांक धुरी, दादा पाटकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, वायरी सरपंच भगवान लुडबे, चंदना प्रभू, तेजस लुडबे, नरेश हुले, यशवंत गावकर, नंदू गवंडी, सिद्धार्थ जाधव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हरी खोबेरकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेने १९ ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळविले आहे. पक्षप्रमुख उद्भव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावरील मतदारांचा विश्वास अधोरेखित झाला आहे. कोळंब, रेवंडीसह प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथ ग्रा. पं. मध्ये आम्हाला यश मिळाले. सगळ्याच ग्रा. पं. मध्ये मतदार राजाने आम्हाला कौल दिला. काही ग्रामपंचायती मध्ये स्थानिक मुद्द्यांमुळे शिवसेनेचा पराभव झाला. मात्र कोणत्याही गावात आम्ही विकासकामे करण्यात कमी पडलो नाही. तरीही जनतेचा कौल आम्हाला मान्य असून पराभव झालेल्या गावात आम्ही चुका सुधारून पुन्हा ताकदीने उभे राहू. तसेच ज्या ठिकाणी सेनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत, तेथे अधिक चांगली कामे केली जातील. यापुढील काळात सुद्धा जास्तीत जास्त कामे करून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडवण्यासाठी आणि शिवसेनेला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

भाजपचे गड असणाऱ्या काही ग्रामपंचायती शिवसेनेने काबीज केल्या आहेत. वर्षानुवर्षे राणे समर्थक भाजपच्या ताब्यात असलेल्या कोळंब, कांदळगाव, श्रावण, राठीवडे, बांदिवडे, असगणी, चौके, असरोंडी, बुधवळे – कुडोपी, रेवंडी येथे शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे. हा भाजपच्या धनशक्तीवर मिळविलेला विजय आहे. आमदार वैभव नाईक यांनी गावागावात केलेली विकासकामे पाहून मतदारांनी यावेळी शिवसेनेला साथ केली आहे. येत्या काही दिवसात अजुनही अनेक ग्रामपंचयातींवर ठाकरे गटाचे वर्चस्व येणार आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

यावेळी हरी खोबरेकर यांनी शिवसेनेच्या सरपंच पदाची यादी जाहीर करत १९ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच बसल्याचे सांगितले. यात कोळंबमध्ये सिया धुरी, रामगडमध्ये शुभम मठकर, श्रावणमध्ये नम्रता मुद्राळे, चौकेमध्ये गोपाळ चौकेकर, राठीवडेमध्ये दिव्या धुरी, बुधवळे-कुडोपीमध्ये संतोष पानवलकर, कांदळगावमध्ये रणजीत परब, रेवंडीमध्ये अमोल वस्त, तळगावमध्ये लता खोत, ओवळीयमध्ये रंजना पडवळ, वायरीमध्ये भगवान लुडबे असरोंडीमध्ये अनंत पोईपकर, बांदिवडेमध्ये आशु मयेकर, वायंगणीमध्ये रूपेश पाटकर, असगणीमध्ये साक्षी चव्हाण, साळेलमध्ये रविंद्र साळकर, देवलीमध्ये शामसुंदर वाक्कर, खोटलेमध्ये सुशील परब यांचा समावेश असल्याचे श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा