You are currently viewing शिरवंडे ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनेल बिनविरोध…

शिरवंडे ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनेल बिनविरोध…

मालवण

तालुक्यातील शिरवंडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार न मिळाल्याची नामुष्की ठाकरे शिवसेनेवर ओढवली. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या रणनीतीमुळे शिरवंडेत सरपंच पदासह ग्रामपंचायतीच्या नऊही जागा भाजपाकडे बिनविरोध आल्या आहेत. या सर्व उमेदवारांचे भाजपा नेते दत्ता सामंत यांनी अभिनंदन केले.

निलेश राणे यांचे नेतृत्व आणि दत्ता सामंत यांचे भक्कम पाठबळ यामुळे शिरवंडे मध्ये भाजपवर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे. आगामी काळात गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता ग्रामस्थांना अपेक्षित विकास घडवून आणला जाईल, अशी ग्वाही सुनील घाडीगावकर यांनी दिली आहे.

शिरवंडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे संपूर्ण पॅनल बिनविरोध झाले आहे. यामध्ये सरपंचपदी चैताली गावकर तर प्रभाग १ मधून सदस्यपदी सुप्रिया बाणे, नयना शिरवंडेकर, विजय खांडेकर, हरेश्वर गावकर, प्रभाग २ मधून कैलास गावकर, तनुजा गावकर, अस्मिता गावकर, प्रभाग ३ मधून सुरेश गावकर, प्राची महेश घाडीगावकर, रघुनाथ गावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

बिनविरोध झालेल्या सर्व उमेदवारांचे भाजप नेते दत्ता सामंत यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, प्रशांत परब, बाळा राऊत, नंदू आंगणे, सरपंच संतोष लाड, सोनू गावकर, रवींद्र बाबली गावकर, विश्वास बाणे, लक्ष्मण गावकर, रवींद्र गावकर, अतुल गावकर, प्रमोद घाडी, हनुमंत गावकर, दिलीप लाड यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरवंडे गावच्या ग्रामस्थांनी भाजपच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास दाखवत ही ग्रामपंचायत बिनविरोध आमच्याकडे दिली आहे. भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत भाजपने कोणत्याही पक्षाशी तडजोड न करता ही ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने ताब्यात घेतली आहे. या निवडणुकीत आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही ऋणी आहोत. आगामी काळात पक्षीय मतभेद विसरून भाजपाच्या माध्यमातून गावचा विकास केला जाईल, अशी ग्वाही माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी दिली. आगामी काळातील प्रत्येक निवडणुकीत ग्रामस्थांनी भाजपच्या बाजूने उभे रहावे. भाजप नेते दत्ता सामंत व्यवसायानिमित्त गेली १० वर्षे शिरवंडे गावात कार्यरत असून या काळात त्यांनी वैयक्तिक निधीतून देखील गावचा विकास केला आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच आज भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत असल्याचेही श्री. घाडीगावकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =