You are currently viewing मिशन आय ए एस संपूर्ण विदर्भात निशुल्क राबविणार…… प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

मिशन आय ए एस संपूर्ण विदर्भात निशुल्क राबविणार…… प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

नागपूर

स्पर्धा परीक्षा ही एक चळवळ व्हावी त्याचबरोबर गोरगरीब होतकरू युवक युवतीना योग्य मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने 22 वर्षांपूर्वी लावलेले मिशन आय ए एस हे छोटेसे रोपटे आज बहारदार वटवृक्षा समान व्हावे ही कल्पना कोणीही केली नसेल पण फक्त एक रुपयात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारी संस्था आज संपूर्ण विदर्भात पसरलेली आहे.ही चळवळ प्रामाणिकपणे राबविणार असल्याचे संस्थापक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आश्वस्थ केले.

सदर संस्थेला स्थापन होऊन आज बावीस वर्षे पूर्ण झाली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात मिशन आयएएस आज संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरेसाहेब यांचे प्रधान सचिव मा.श्री विकास खारगे यांच्या हस्ते बारा मे 2000 रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाला.प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिनय कुंभार आय आर एस .अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री धनराज खामतकर व प्रा.अमोल पाटील हे होते .अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी सुरू झालेला व विनामूल्य सेवा देणारा हा पहिला उपक्रम. त्यापूर्वी अमरावती शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एकही ग्रंथालय किंवा अभ्यासिका उपलब्ध नव्हती. परंतु विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य श्री बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे यांनी पुढाकार घेतला व या उपक्रमाची मुहूर्तमेढ अमरावती शहरात 12 मे 2000 रोजी करण्यात आली. या 22 वर्षात मिशन आयएएसने संपूर्ण भारतात आपल्या प्रबोधनाचे जाळे विणले आहे.
या 22 वर्षात मिशन आयएएसमध्ये जवळपास दोनशे आयएएस व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. मिशन आयएएसने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत संस्कार शिबिरात या अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले आहे .विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री जे पी डांगे यांनी एकूण तेरा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर दुसरे मुख्य सचिव श्री रत्नाकर गायकवाड यांनी देखील आमच्या उपक्रमात भाग घेतला आहे एवढ्या मोठ्या संख्येने आय ए एस. सनदी अधिकारी सहभागी झालेली मिशन आयएस ही भारतातील एकमेव संस्था आहे. *फक्त एक रुपयात*
आय ए एस मिशन आयएएसतर्फे फक्त एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते .विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला 365 रुपये भरायचे. त्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात. त्यांची परीक्षा घेण्यात येते. त्यांचे पेपर तपासण्यात येतात आणि त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देखील देण्यात येते. फक्त एक रुपयामध्ये आयएएसची प्रशिक्षण देणारी मिशन आयएएस सारखी दुसरी संस्था आज तरी अस्तित्वात नाही .सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून देण्यात येते .शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी मानसिकता तयार करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. * * * संपूर्ण भारतात 15000 कार्यशाळा 12 मे 2000 रोजी अमरावतीला स्थापन झालेल्या मिशन आयएएसने आतापर्यंत संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात 15000 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत.त्यांच्या या कार्यशाळेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री रमेश घोलप आयएएस व श्री विशाल नरवाडे यांचा समावेश आहे. या उपक्रमाला संपूर्ण भारतात उत्तम प्रतिसाद असून अशाप्रकारे पूर्ण भारतात स्पर्धा परीक्षा घेऊन मिशन आयएएसने व्यापक जनजागृती केली आहे . * ** लाँकडाऊनचा सदुपयोग* गतवर्षी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे विविध राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी मिशन आयएएसने 5 जून 2020 पासून जय जवान जय किसान ही स्पर्धा परीक्षेला वाहिलेली व्याख्यानमाला सुरू केली. गेल्या अकरा महिन्यापासून ही व्याख्यानमाला सुरू असून या व्याख्यानमालेमध्ये अनेक आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी व्याख्याते म्हणून आलेले आहेत .याशिवाय विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांचा सुसंवाद व्हावा यासाठी मिशन आयएएसने वेळोवेळी झूम मिटींगचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळे सनदी व राजपत्रित अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद असून लोकांनी लाँकडाऊनच्या काळात या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे . * आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार मिशन आयएएसने गेल्या 22 वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी अमरावतीला आयोजित केला आहे. या सत्कारांमध्ये बरेचसे आईएएस टॉपर अमरावती शहरात येऊन गेले आहेत. त्यामध्ये भारतातून पहिली आलेली शेना अग्रवाल पंजाब .अमृतेश औरंगाबादकर पुणे. राहुल रेखावार नांदेड. शिप्रा आग्रे लातूर .डाँ.विपीन इटणकर चंदिगड .डा.अश्विनी जोशी रत्नागिरी. संपदा मेहता पुणे. श्री विशाल नरवाडे बुलढाणा यांचा समावेश आहे. यावर्षी देखील लाँकडाऊन असताना झूम मीटिंग द्वारे झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड .माजी सनदी अधिकारी श्री किशोर गजभिये .यशदाचे डॉ. बबन जोगदंड व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे उपस्थित होते . * पुस्तकांचे प्रकाशन मिशन आयएएसने या 22 वर्षात स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये मी आयएएस अधिकारी होणारच. शेतकऱ्याची मुले झाली कलेक्टर. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी. प्रेरणा स्पर्धा परीक्षेची. आनंदी राहा यशस्वी व्हा. विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लाकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ही पुस्तके ई-बुक स्वरूपात विनामूल्य वितरित करण्यात आली आहेत .मिशन आयएएसची ही वाटचाल गेल्या 22 वर्षांपासून निरंतरपणे सुरू असून स्पर्धा परीक्षेसाठी 24 तास विनामूल्य सेवा देणारी ही भारतातील एकमेव आकादमी आहे. * 23 ते 100 अधिकारी मिशन आयएएसने 12 मे 2000 रोजी जेव्हा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तेवीस विद्यार्थी हे आय ए एस परीक्षा पास होत होते .मिशन आयएएसने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जिथे जमेल तिथे विनामूल्य स्पर्धा परीक्षा घेऊन जे वातावरण तयार केले तसेच महाराष्ट्रातील इतरही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे या 22 वर्षानंतर या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेच्या निकालात अभूतपूर्व बदल झाला असून हा आकडा 23 वरून 22 वर्षात 100 च्या वर गेलेला आहे. सातत्याने एखाद्या उपक्रमाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा केला तर समाजामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे मिशनने सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे .
या पत्रपरिषदेला स्वतः डॉ नरेशचंद्र काठोळे, विकास भाऊ ढेंगे, प्रा. सुभाष नलांगे,प्रा. बी एन शिंदे,प्रा. ममता मून जावेद कुरेशी,प्रमोद जवादे, मुकेश कुमार साहू प्रवीण पटेल, तृप्ती सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा