You are currently viewing जगायचा प्रत्येक क्षण ..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जगायचा प्रत्येक क्षण ..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

जगायचा प्रत्येक क्षण .

फारच करंट आणि छान विषय आहे हा …
हा विषय तर अत्यंत जिव्हाळ्याचा नि प्रचंड आहे.
हो …जगणे काय सोपी गोष्ट आहे काय …?

त्यातून अजून प्रत्येक क्षण … बाप रे …
म्हणाल तर जगणे अत्यंत सोपे आहे.. म्हणाल तर ..
अत्यंत अवघड आहे. त्यातून प्रत्येक क्षण कुणाच्या वाट्याला
कसा येतो नि तो त्याक्षणी काय करतो, काय विचार करतो?
कसा जगतो .. मोठा गहन विषय आहे हा ….

आता बोलतांना आपण म्हणतो , प्रत्येक क्षण आनंदाने जगला
पाहिजे वगैरे वगैरे … बोलणे फार सोपे आहे हो ..पण तशी
परिस्थिती हवी ना .. ? माणसाला नेहमी परिस्थिती निर्माण
करता येत नाही.किंबहुना त्याच्या हातातही नसते ते… इतका
परस्वाधिन असतो तो. .. जन्म घेणे कुठे आपल्या हातात आहे..? गंगेच्या काठावर घरदार नसलेला अर्धवस्र माणूस
जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकतो काय …?प्रत्येक
क्षणी त्याला वाटते, मला अंगभर कपडा ही मिळू नये असा
काय बरे मी गुन्हा केला आहे.. समोरून भरजरी वस्रात
वावारणाऱ्या माणसाचा राग न यायला तो काय तुकाराम ..
नामदेव आहे काय ? तो तुलना करतो , चिड चिड करतो व ते ही अगदी स्वाभाविकच असते कारण आपण सारे सामान्य
माणसे आहोत.

“ ग दि मा … म्हणतात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
….. दोष ना कुणाचा ….”
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ….
तोवर एखादी लाट येते नि पुन्हा ते अलग होतात …
हा ताटातुटीचा खेळ ही चालूच असतो …..

 

त्या उलट महालात जन्म घेऊन मऊ दुलईवर लोळणारा ही
तो क्षण आनंदात जगत असेलंच असे नाही ..?
मग , काय आहे , जगण्याचे व तो ही प्रत्येक क्षण आनंदाने
जगण्याचे …. गुपित ..?
मंडळी, यातील बऱ्याच गोष्टी व्यक्ती सापेक्ष व बऱ्याच
गोष्टी परिस्थिती सापेक्ष असतात ..झोपडीत राहून ही प्रत्येक
क्षण आनंदात जगणारे लोक आहेत उलट परिस्थिती अत्यंत
अनुकुल असतांना प्रत्येक क्षण दु:ख्खात बुडवणारे लोकही
आहेत …

 

म्हणून मी म्हटले …या गोष्टी परिस्थिती सापेक्ष आहेत .
दिवसभर अन्नाच्या शोधात वणवण भटकणाऱ्या बालकाला
कुठूनही शिळ्या अन्नाचे दोन घास जरी मिळाले तर तो क्षणच नव्हे तर तो पूर्ण दिवसच त्याचा गोड होतो व दिवसभर तो
त्याच विचारात मग्न असतो, तो विचार त्याला पुन्हा पुन्हा
आनंद देतो . या उलट महालात राहून पंचपक्वान्नाचे ताट
समोर येऊन ही विषण्णपणे त्या ताटाकडे बघत राहणारे व
ती पंचपक्वान्ने ही गोड न लागणारी ही माणसे असतात .
त्यांना कशातच गोडी वाटत नाही. याला काय म्हणावे .?

 

तर .. काही गोष्टी परिस्थिती बिघडवतात तर काही गोष्टी
माणूस बिघडवतो. हो .. माणूस मोठा विचित्र प्राणी आहे .
माणसा इतका स्वार्थी व लबाड जगात सापडणे अवघड
आहे. प्राणी पक्षी खूप चांगले . त्याच्यात दया माया आहे .
आपल्या पेक्षा कोणी दुसरा मोठा झाला की माणूस दु:ख्खी
होतो.स्वत: जवळ जे आहे ते व्यर्थ वाटून तो जळू लागतो व
दु:ख्ख ओढवून घेतो.
बघा सुखात असून दु:ख्खी होतो … कुणी मान्य करो वा ना करो … षड्रीपूंनी ग्रस्त आम्ही लोक स्वत: ही सुखी रहात नाही
व दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही. स्पर्धा इर्षा भांडणे जणू
आमच्या पाचवीला पुजली आहेत ..

 

तुम्ही म्हणाल मग काय जगात चांगली माणसेच नाहीत
काय ? आहेत ना … किती टक्के आहेत ? तुम्हीच सांगा मला ..
आणि त्यात आपण स्वत: आहोत का हे ही शोधून सांगा .
दुसरा महात्मा आहे हे फक्त सांगायलाच आवडते . स्वत:
महात्मा व्हायला नाही आवडंत .. बरोबर आहे … सोपे का
आहे ते ..?

 

त्या मुळे आपला जगण्याचा प्रत्येक क्षण सुखी आनंदी कसा
करता येईल .. आहे त्या परिस्थितीत सुखी कसे राहता येईल
याचा प्रत्येक माणसाने विचार करायलाच हवा मग परिस्थिती
कशी ही असो. दु:ख्खी कशासाठी रहायचे ? हा अनमोल जन्म
आनंदा साठी आहे.. स्वत:च्या व इतरांच्याही हे आपण लक्षात
ठेवायला हवे . कमीतकमी आपण इतरांच्या दु:ख्खाचे कारण
तरी बनता कामा नये एवढे केले तरी पुरे .. म्हणजे तो माणूस
सुखाचे क्षण वेचू शकेल .. होय ना …?

तर मग …

चला … जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा करू या ..
इतरांना ही आनंद देऊ या …

“नव्या वर्षाचा संकल्प समजा वाटल्यास .. काय हरकत आहे ?”
॥ धन्यवाद ॥

आणि हो …
…… ही फक्त माझी मते आहेत …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३१ जानेवारी २०२२
वेळ : दुपारी २ : ०५

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − two =