You are currently viewing पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक! खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे

पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक! खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे

ठाणे प्रतिनिधी

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्वः वैश्विक ते स्थानिक आव्हाने व संधी’ या – विषयावर एक दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर , ज्येष्ठ अर्थ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. विभूती पटेल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, भाजप राज्य उपाध्यक्ष माधवी नाईक, महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकर, मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. मृदुल निळे हे मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेत ही परिषद ऑनलाइन झूम आणि युट्युब या माध्यमांवर प्रक्षेपित करण्यात आली.
परिषदेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.प्रियंवदा टोकेकर यांनी अतिशय प्रवाही शब्दात प्रास्ताविक केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील स्त्रियांचा राजकीय सहभाग याबद्दल त्यांनी आपले मत मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक म्हणाल्या की भारतीय महिला ही निराळी असून तिच्यात नेतृत्वाची भूमिका उत्तमरित्या बजावण्याचे सामर्थ्य आहे. ज्येष्ठ कवयित्री अमृता प्रीतम यांच्या ओळींचा संदर्भ देत त्यांनी भारतातील स्त्री शक्तीच्या नेतृत्वगुणांचा उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्यसभा खासदार व संसदीय स्थायी समिती अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्त्रियांची सामाजिक भुमिका यावर भाष्य केले. वेदकाळातील मैत्रेयी, गार्गी व रामायण-महाभारतातील सीता व द्रौपदी यांच्या व्यक्तिरेखेचा त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणाले की ‘इतर देशांच्या तुलनेत भारत हा महिलांचा पुढाकारात सुरुवातीपासूनच अग्रेसर आहे तसेच भारतीय महिला या प्राचीन काळापासूनच सामाजिक नेतृत्वाची भूमिका प्रभावीपणे बजावत आल्या आहेत. तर अलीकडच्या काळात काही दशकांपासून स्त्रियांच्या अवस्थेला हा समाज जबाबदार आहे कारण पुरुषांच्या परंपरागत मानसिकतेच्या परिवर्तनाकडे दुर्लक्ष होत आले आहे. ज्येष्ठ सर्वोदयी नेते दादा धर्माधिकारी यांचा उल्लेख करत वैचारिक परिवर्तनाशिवाय स्त्री पुरुष समानता पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही असे असे प्रतिपादन केले’. तसेच विवाहाचे वय 21 वर्षे करावे या सरकारी विधेयकाबद्दल चर्चा करण्यासाठी समितीमध्ये स्त्रियांचा पुरेशा समावेश नाही अशी आवई उठली होती. मात्र जोपर्यंत पुरुषांच्या परंपरागत मानसिकतेत बदल होणार नाही तोपर्यंत त्यांच्या सामाजिक स्थानात बदल होणार नाही .त्यासाठी गतिशीलतेने व परिणामकारकतेने मानसिक परिवर्तन करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संशोधन अहवालाचा संदर्भ देत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी महिलांचा राजकीय क्षेत्रातील प्रभावाबद्दल मत मांडले. ते म्हणाले की ‘एकोणिसाव्या शतकात महिलांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांची आत्मजाणीव जागृत होण्यास सुरुवात झाली परंतु राजकीय क्षेत्रातील पुरुषांचा प्रभाव अधिक असल्याने त्यावेळी काही ठिकाणी महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते परंतु स्त्री पुरुष समानता पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वात प्रथम श्रमाची विभागणी ही समान होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पालन-पोषण ही संज्ञा केवळ स्त्रियांशीच नव्हे तर पुरुषांशी देखील तितकीच निगडित आहे. त्यामुळेच पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील प्रत्येक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात समान हक्क आणि संधी मिळाव्यात यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे ‘ असे त्यांनी सांगितले.

यानंतर कार्यक्रमाच्या बीजभाषण वक्त्या डॉ.विभूती पटेल यांनी आपल्या भाषणात ‘स्थानिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर निर्णय प्रक्रियेत प्रभावी भूमिका आणि धोरण निश्चित करण्यासाठी महिलांना मतदार, उमेदवार, निवडून आलेले प्रतिनिधी या नात्याने सक्रिय राजकीय सहभागासाठी समान खेळाचे क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी आजच्या काळातील महिलांचा, विविध क्षेत्रात जागतिक पातळीवर असणारा सहभाग आणि आतापर्यंत स्त्रियांचा झालेला सर्वांगीण विकास यावर भाष्य केले.

परिषदेच्या पुढील सत्रास ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी द्विवेदी तसेच मुंबई विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात यांनी एका सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. गौरी द्विवेदी यांनी जागतिक पातळी वरील स्त्रीयांचे नेतृत्व यावर भाष्य केले . आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की भारतच नव्हे तर जगातील इतर देशांमध्ये देखील स्त्रियांचे जागतिक पातळीवर नेतृत्व हे अतिशय कमी प्रमाणात दिसून येते गेल्या अनेक वर्षांपासून आकडेवारी लक्षात घेता केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच स्त्रिया जागतिक पातळीवर नेतृत्वाची भूमिका बजाऊ शकल्या आहेत आहेत , ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पुढील शंभर वर्षात तरी स्त्री पुरुष समानतेची चर्चा पूर्णत्वाकडे जाणार नाही असे त्या म्हणाल्या. भारतासारख्या इतर विकसनशील तसेच विकसित देशांमध्ये देखील स्त्रियांचा राजकीय सहभाग हा अजूनही क्वचितच दिसून येतो त्यामुळे या यात सुधारणा करण्यासाठी आपण छोटी छोटी पावले उचलत आपल्या यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी जागतिक स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी सांगितले.

मान्यवर वक्त्यांच्या परिसंवादात साठी भीम रासकर ,महिला राजसत्ता आंदोलन, डॉ. शुभा राऊळ, मुंबईच्या माजी महापौर,अडव्होकेट माधवी नाईक -उप अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, भाजपा , कल्पनाताई महाले , सरपंच, शिरसगाव या अनुभवी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
या परिचर्चेत सर्व मान्यवरांनी स्त्रियांचा राजकीय क्षेत्रातील प्रभाव आणि कामगिरी याबद्दल आपले मत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मांडणे त्याचबरोबर स्त्रियांना विविध क्षेत्रात आपल्या हक्कासाठी तसेच संधी प्राप्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल चर्चा केली.

कार्यक्रमाचा समारोप सत्रासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या. यावेळी त्यांनी स्त्रियांचे जागतिक ते स्थानिक पातळीवरील नेतृत्व : आव्हाने आणि संधी याबद्दल थोडक्यात आपले मत मांडले त्या म्हणाल्या की ‘आपल्या देशात महिलांची बरीच शक्ती ही लोकांचा दृष्टिकोन समजून घेण्यात जाते. बऱ्याच वेळा स्त्रियांना महत्त्वाचे निर्णय घेताना दुय्यम लेखले जाते परंतु स्त्री ही वैयक्तिक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील तितक्याच प्रभावीपणे कार्य करू शकते कारण स्त्री ही अतिशय सहनशील आणि बहुकार्यक्षम आहे. अलिकडच्या काळात स्त्रिया एकाच वेळी अनेक ठिकाणी सक्रियपणे कार्य करत असतात परंतु अजूनही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिले आहेत’ त्यामुळे समाजाने स्त्रियांसाठी निर्माण केलेला दृष्टिकोन बदलून स्त्रियांना त्यांचे हक्क आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात संधी प्राप्त व्हावी यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. न्यूझीलंडच्या राष्ट्राध्यक्षा जेसिंडा आर्डन यांचा उल्लेख करत स्कँडिनेव्हियन देशांमध्ये महिलांनी पर्यावरणावर विशेष लक्ष दिले आहे असे त्या म्हणाल्या . जगाच्या शाश्वत विकासासाठी महिलांचे सक्षमीकरण होणे अत्यावश्‍यक आहे . 2030 दशक हे कृती दशक असून स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचे दूत व्हा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे देवेंद्र पै यांनी उपस्थितांचे आभार मानले. भारतातील विभिन्न राज्यांमधून 37 शोधनिबंध प्राप्त झाले असून बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक व संशोधकांनी या परिषदेत सहभाग नोंदवला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रा.श्वेता अहिरे आणि प्रा.स्वप्नील मयेकर तसेच विद्यार्थ्यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 15 =