You are currently viewing उर्जा संरक्षण … काळाची गरज …
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

उर्जा संरक्षण … काळाची गरज …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख

उर्जा संरक्षण … काळाची गरज ….उर्जा .. शक्ती .. चैतन्य …

मग ती उर्जा माणसातली असो वा निसर्गातली …जगण्याची
मुलभूत शक्ती, म्हणजे उर्जा ….

काही कारणास्तव देवळाली सिन्नर रस्त्याने मी बऱ्याच वेळा
प्रवास केला. घोटी पासून सिन्नर कडे जातांना त्या घाटातील
उंचावरील पहाडी भागात मला ठिकठिकाणी महाकाय अशा
गगनचुंबी पवनचक्या दिसल्या नि मला मोठे नवल वाटले. कारण एवढ्या संखेने व एवढ्या प्रचंड पवनचक्या मी तो पर्यंत
पाहिल्या नव्हत्या.

 

असेच एकदा फार वर्षांपूर्वी साक्री निजामपूर भागात गेलो असता तेथे ही असेच दृष्य दिसले. व मोठे नवल वाटले. कारण
त्याच्या कार्यकारणभावा विषयी फारसा विचारच कधी केला
नव्हता.आता अलिकडे उर्जा वाचवा उर्जा वाचवा म्हणतांना
मग विचार केला की खाजगी आणि सरकारी पातळीवर उर्जा
निर्मिती व बचतीसाठी किती मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू
असतात त्याची फारशी माहिती ही आपल्याला नसते व त्याची फारशी दखल ही आपण घेत नाही.

 

ह्या पवनचक्कीच्या अगदी टोकाला एक गोलाकार खोली
बांधलेली असते व मोटरच्या सहाय्याने तिथे आपल्याला जाता
येते व अमाप अशा खुल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो
व तिथे बसून उंचावरती भोजनाचाही आस्वाद ही घेता येतो, हा
झाला गमतीचा भाग .. पण आपल्याला व शेतीला लागणारी
उर्जा, ह्या पवनचक्या, धरणे , नद्या चोविसतास निर्माण करत असतात
हे आपल्या लक्षातही येत नाही.. इतके आपण आपल्या रोजच्या व्यापात गुंतलेले असतो.

 

ह्या पवनचक्या जास्त करून खाजगी कंपन्या चालवतात.
शेतकरी त्यांना भाड्याने जमिन देतात असे मी ऐकले आहे .
वीज , उर्जा आपल्या जगण्यातील अत्यंत महत्वाची भूमिका
निभावतात किंबहूना त्यांशिवाय जगणे आज तरी अगदी अशक्य आहे असे म्हणण्या इतपत ते आपल्या जीवनाला
चिकटलेले आहेत.जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उर्जेचा प्रचंड वापर होतो.उदा.इलेक्ट्रॉनिक उपकरणे . शाळा कॅालेजेस मधून घराघरातून प्रचंड उर्जा लागते व खर्च होते. म्हणजे आपण ती
किती जबाबदारीने वापरली पाहिजे याचे भान असूनही ती
अत्यंत बेफिरपणे वापरली जाते हे सत्य कोणीही नाकारू
शकणार नाही . ह्या उर्जेसाठी लागणारे पाणी ही आम्ही …
बेफिकीरपणेच वापरतो हेही कठोर सत्य आहे.

 

बदलत्या ऋतुमानात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगात कितीतरी ठिकाणी जमिनीतले पाणी आटून एका देशातील
नागरिकांना आपला देश घरदार सोडून परगंदा व्हावे लागल्याचे
आपण वाचले असेलच..! देव न करो .. भविष्यात आपल्यावर
अशी वेळ न येवो …म्हणूनच नुसती उर्जाच नव्हे तर जी जी
नैसर्गिक साधन संपत्ती निसर्गाने मुक्तहस्ते आम्हाला बहाल केली आहे ती ती आम्ही काळजी पूर्वक , काटकसरीनेच
उधळपट्टी न करताच वापरली पाहिजे. उदा. पेट्रोलचे भाव वाढले हा कांगावा करतांना आपण किती अनाठाई पेट्रोल
उधळतो, ह्याचा विचार कोणी करतो? मला वाटते फार कमी
लोक हा विचार करतात व तसे वागतात.हो … नुसता विचार करायचा नसतो तर कृती करायची असते. आपण फक्त दुसऱ्याला शिकवतो कारण प्रत्येकाला वाटते मी .. मी चुकतंच नाही, पण तसे नसते …”दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ आपल्याला दिसते पण .. आपल्या डोळ्यातील मुसळ दिसतंच
नाही .. हीच आपली शोकांतिका आहे… हो … लोकसंख्या
वाढली आहे पण .. मी नाही हो त्यात …! लोकसंख्या वाढली
आहे ….!

 

घरात सुद्धा विजेचा वापर करतांना खूप लोक गरज नसली
तरी घरभर दिवे लावून ठेवतात.. हो आम्ही बिल भरतो ना ?
अहो, बिल भरता म्हणून अनाठाई विज वापरायची का ?
घरभर दिवे ,पंखे चालू ठेवायचे का ..? मोलकरणी व घरातील
स्रिया सुद्धा वाटेल तसे पाणी सांडतात .. अनाठाई वापर मग
तो कसलाही असो थांबायलाच हवा … खेड्यापाड्यातून वाट्टेल तशी आकडे टाकून फुकट व बेसुमार वीज वापरली जाते नव्हे
उधळपट्टी चालू आहे,तरी सरकारच्या नावाने खडेफोड आहेच!
खरेच .. कधी आम्ही स्वत:शी तरी खरे बोलणार आहोत …?
इतका स्वार्थी पणा बरा नव्हे .. काळ नावाची गोष्ट आपल्याला
कधीच माफ करत नाही… हे माहित असून आम्ही खोटेपणानेच
वागतो नि त्याचे परिणामही भोगतो …

 

आताअलिकडे सौरउर्जेचा वापर खूप वाढला आहे ही त्यातल्या त्यात खूप जमेची बाजू आहे तरी पाहिजे त्या प्रमाणात आम्ही अजून तिला उपयोगात आणू शकत नाही
आहोत … पण लवकरच तो ही दिवस येईल व नविन संशोधनाने सौरउर्जा आपण १००/. उपयोगात आणू शकू …!

आणि हो … ही फक्त माझी मते आहेत बरं …
अरे… ! काय म्हणालात ? तुम्ही १००/. सहमत आहात …
तो , ये हुई ना बात ….

Thank you very much…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + ten =