You are currently viewing तेव्हा माघार घ्यावी….

तेव्हा माघार घ्यावी….

जेव्हा आपलंच माणूस
अनोळखी होतं …
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…….

जेव्हा संपतात सारी नाती
काही सकारण… अन
काही विनाकारण….
तेव्हा पुरावे मागू नयेत
नाती संपण्याचे..
तेव्हा….
शांतपणे माघार घ्यावी…

कधी काळी असतो आपण
कुणाचे तरी …हक्काचे
कधीतरी असते जागा
कुणाच्यातरी डोळ्यात…
पण कधीतरी नजरच होते
अनोळखी आणि परकी..
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

कधीतरी आपण उगाचच
जपतो कुणालातरी…
मनात खोलवर…
जणू आपल्या अस्तित्वालाच
हवाली करतो कुणाच्यातरी
मर्जीवर आणि मनावर..
पण कधीतरी जाणवत…
कुणालाच नाही आपल्या
अस्तित्वाची दखल…
तुम्हीच बेदखल होता..
त्याच्या भावविश्वातून…
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

उत्तराच्या अपेक्षेने…
का करून घ्यावेत स्वतःला
प्रश्नांचे डंख….
मिळणार नाहीत कधीच
प्रश्नांची उत्तरे….
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

जेव्हा सगळंच संपते…
तेव्हाच नियती दान करते
एक अनमोल नजराणा…
त्याचं नाव …अनुभव
म्हणून सगळं संपत तेव्हा….
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी..

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =