You are currently viewing “आजचा तरुण वैचारिक दृष्ट्या खूप परिपक्व आहे” – सुहास घुमरे

“आजचा तरुण वैचारिक दृष्ट्या खूप परिपक्व आहे” – सुहास घुमरे

प्राधिकरण – (दिनांक -१४ ऑगस्ट)

आजचा तरूण हा वैचारिक दृष्ट्या खूप परिपक्व आहे. पण त्याने अती उत्साहात स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगताना दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता त्याने घ्यावी असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी गझलकार, साहित्यिक सुहास घुमरे यांनी व्यक्त केले. सुहास घुमरे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन पर गोष्ट सांगून काव्य लिखाणासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या.

स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येला निमंत्रित कवी आणि विद्यार्थ्यांचे कवी संमेलन तसेच निबंध स्पर्धाचे आयोजन, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथील गुरुकुल विभागात करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी कवींचा मोठा प्रतिसाद मिळाला. इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन केलेल्या ‘विविधतेतील एकता’ या विषयावरील निबंध स्पर्धेत 126 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवृत्त शिक्षिका व साहित्यिका रजनीताई अहेरराव यांनी काम पाहिले. त्या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “निबंध वाचताना कुठे बालमनाची निरागसता जाणवली, कुठे विचारांची प्रगल्भता दिसली, तर कुठे कल्पनाशक्तीने मनाला सुखद धक्का दिला. काही विद्यार्थ्यांनी अगदी साध्या विषयाकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले होते. ‘विविधतेतून एकता’ या विषयावरील निबंधामधून तर आपल्या देशातील विविध भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा आणि विचार यांच्यातील एकात्मतेची सुंदर जाणीव अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत व्यक्त केली आहे.”

प्रमुख पाहुणे साहित्यिक व पत्रकार श्री पितांबर लोहार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “भारतीय समाज व्यवस्था कुटुंबवत्सल आहे. यामध्ये आई-वडिलांच्या सेवेला देवता समान महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचा हा एक संस्कार आहे. साक्षात परमेश्वरालाही युगानुयुगे विटेवरी उभे करण्याची ताकद या संस्कारात आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरचे भक्त पुंडलिक आणि कमरेवर हात ठेवून युगानुयुगे विटेवर उभा असलेला पांडुरंग होय.” तसेच श्री. पितांबर लोहार यांनी ‘साथ चल’ ही हिंदी रचना सादर केली आणि भाऊ बहिणीवरील ‘आई बघ ना’ ही मराठी रचना सादर केली.

स्वयंसिध्दा प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे या आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की, “ज्याप्रमाणे देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये, स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान होते, त्याचप्रमाणे, देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये साहित्यिकांची ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी त्यांच्या लेखणीने लढाई लढली व देशभक्ती समाजात जागृत ठेवली.”

निमंत्रित कवी माधुरी विधाटे यांनी “समर्थ भारत होने का, रखते है अभिमान” निलेश शेंबेकर यांनी “स्वातंत्र्याचा दिव्य तिरंगा मनांत कायम लहरत आहे..नव्या युगाचा नवीन भारत नव तेजाने तळपत आहे”

सौ.माधुरी डिसोजा यांनी “झेंडा आमुच्या प्रिय देशाचा फडकत वरी महान, करितो आम्हीं प्रणाम याला करितो आम्हीं प्रणाम”

सीमा गांधी यांनी, “तिरंग्याची शान राखूया, देशासाठी जगू या,”

“स्वातंत्र्याची अमूल्य ज्योत,पिढ्यान्‌पिढ्या जपूया…..” हेमंत जोशी यांनी, “ब्रम्हांडातील एकमेव अन सुंदर रचना म्हणजे भारत झाशी राणी आणि अहिल्या वीरांगना म्हणजे भारत”… तानाजी एकोन्डे यांनी, सुंदर माझे घर गे । संतांचे माहेर

ओव्या गाऊ मधुर । पांडुरंग”

यावेळी विद्यार्थ्यामध्ये कणाद गोडसे याने, “हे युवका तू विसरलास का! विसरलास का इतिहास तुझा!”,अर्चीस केळकर याने “मातृभूमीची मूर्ती आमुच्या हृदय मंदिरात वसे”,अमेय पानसरे याने, “आज गाऊया अभिमानाने या देशाचा इतिहास” अर्णव याने, “चापोलीकर अजिंक्य करू या जगतामध्ये आपला हिंदुस्थान”… गार्गी तळोले हिने, “वचन भारतमातेला”…. सायली बोरमाळे हिने,”माझा भारत माझा अभिमान”.आनंदी कुलकर्णी या विद्यार्थिनीने, “माझी देशभक्तीची कल्पना”.राशी रोकडे – “तूच माझा अभिमान”… अद्विता – “वय होते १५ या शिरीषकुमाराचे वंदे मातरम गायल्यामुळे शिक्षा १५ फटके ,१७ होते वय ती कनकलता बरूआ वंदे मातरम गाता गाता प्राण तिने सोडला”… सारंग मुचरीकर – “मातृभूमीच्या इतिहासाची वर्णने दूरदेशी”.क्षिप्रा नरोटे -“भाषा भूषा परंपरा यामध्ये वाटे विविधता_ पण हीच माझ्या देशाची खरी समृद्धता”.सुश्रुता कानडे – “रंग रूपान राहणे जरी असे वेगळे साजरी करतो आम्ही एकात्मतेचे सोहळे”.. शर्वी भैय्या – “सदापरोपकारी शुद्ध निर्विकारी हा देश की मी या गारी मी सदैव आभारी”.. अशा एकूण २१ विद्यार्थ्यांनी सदाबहार रचना सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कवितांमधून देशभक्ती व वैचारिक प्रगल्भता दिसून आली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका शोभाताई जोशी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या संयोजनात राजश्री मराठे मॅडम, श्रीराम दादा, गुरुकुल विभागाचे शिक्षक वर्ग, व विद्यार्थ्यांचे संयोजनात सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सुंदर व नेटके सूत्रसंचालन स्वयंसिद्धाचे, उपाध्यक्ष श्री नंदकुमार मुरडे यांनी केले. आभार राजश्री मराठी मॅडमनी मानले.

निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

इयत्ता सातवी-प्रथम क्रमांक- कु. स्वरा रामदास काळे, द्वितीय क्रमांक- कु. आराध्या विष्णू कदम, इयत्ता आठवी- प्रथम क्रमांक-कु.आरोही यशवंत काळे, द्वितीय क्रमांक- कु.स्वरांजली विक्रम केसवड, तृतीय क्रमांक- चि. अथर्व हेमंत जोगळेकर, इयत्ता नववी-प्रथम क्रमांक-चि.शुद्धोधन योगेश भंडारी, द्वितीय क्रमांक-कु. कौशिका कपिल दामल, इयत्ता दहावी-प्रथम क्रमांक-चि.विश्वेश प्रशांत खैरनार, द्वितीय क्रमांक-कु.आनंदी जगजीत कुलकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा