You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम संपन्न

वैभववाडी.

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभागाच्यावतीने ११ जुलै,२०२१ हा ३३ वा जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला‌.
जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व लोकसंख्या वाढीच्या समस्येची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सी. एस.काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाव्हिया देशात पाच अब्जव्या बालकाचा जन्म झाला. युनोने वाढत्या जागतिक लोकसंख्येचा विचार करुन १९८९ पासून ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करायचे ठरविले. जागतिक पातळीवर विचार करता वाढती लोकसंख्या ही भारतासारख्या काही राष्ट्रांच्या दृष्टीने समस्या तर काही राष्ट्रांच्या संपत्ती ठरली आहे. भारतातील संसाधनांचा योग्य वापर आणि प्रत्येकाच्या हाताला काम दिल्यास समस्या राहणार नाही. दोन पेक्षा अधिक अपत्ये असल्यास सरकारी नोकरी व इतर लाभ नाही असा कायदा करण्याचा विचार यूपी सरकार करीत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्र सरकारला सूचित केले आहे. या सर्व घटनांवरून भविष्यात लोकसंख्या नियंत्रण करण्याबाबत एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. निसर्ग सुद्धा आपल्यापरीने लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचं कार्य करीत आहे असे प्रास्ताविकपर मनोगतात प्रा.एस. एन. पाटील यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु‌. प्रचीता दळवी हिने सांगितले. लोकसंख्या वाढीला अनेक कारणे जबाबदार असून कमी वयात विवाह होणे व शिक्षणाचा अभाव ही कारणे महत्त्वाची आहेत असे व्दितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु.वृषाली जाधव हिने सांगितले.
प्रा.आर.एम. गुलदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगाची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. तसेच भारत आणि चीनच्या लोकसंख्येची तुलना केली तर भारत कसा पुढे जाणार आहे यावर भाष्य केले‌. लोकसंख्या दिनाचे कार्यक्रम घेणे महत्त्वाचे आल्याचे सांगितले. या ऑनलाईन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.गुलदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.प्रा.बी.डी. इंगवले यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा