You are currently viewing कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

तळमजल्यावरील सारस्वत बँक व हॉटेलचे नुकसान

कणकवली

गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने काल सायंकाळ पासून आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या वर्षी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले. इमारतीच्या तळमजल्यावर सारस्वत बँक एक हॉटेल व निवासी संकुल असल्याने काही भागात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाले.

तळमजल्याला पाणी भरल्याने जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली. लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.जवळील नाल्याचे पाणी नाल्या मधून बाहेर पडत बिल्डिंगच्या तळमजल्यावर आले पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे असणारा डायनिंग हॉल दुकाने तसेच घरामध्ये सर्वच ठिकाणी तळमजल्याला पाणी साचले यावेळी लगेचच तेथील रहिवाशांनी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यलय, नगरपंचायत यांना कळवले व आपली वाहने तिथून सुरक्षित ठिकाणी लावली पण सकाळी सात वाजेपर्यंत पाणी ओसरले तरीही कोणतीही प्रकारची आपत्कालीन मदत येथे उपलब्ध न झाल्याने तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी संजय राणे, अमोल कोळी अशोक कदम, पांडुरंग कुलकर्णी, अरुण चव्हाण, सुभाष सावंत, माधव कदम, सुनील कदम ,अमित दळवी,उपस्थित होते महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेला दुर्लक्ष आहे.त्यामुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना यावर्षी पुन्हा त्रास भोगावा लागला आहे. कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार कंपनीने काम संपल्याने काढता पाय घेतला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे.

त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे. अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे. पावसाच्या सुरवातीलाच अशी अवस्था होत असेल तर पुढील दिवसात काय होईल याची चिंता सतावू लागली आहे. गत वर्षी पावसाच्या पाण्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान केले होते.त्यामुळे निदान यावर्षी तरी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =