You are currently viewing ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात 7 जूनपासून  ‘स्तर 4’ चे निर्बंध होणार लागू

ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात 7 जूनपासून  ‘स्तर 4’ चे निर्बंध होणार लागू

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी 

ब्रेक दि चेन अंतर्गत आज विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधित दरानुसार (पॉझिटिव्हीटी रेटनुसार) राज्य शासनाने विविध पाच स्तर निश्चित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर 4 चे निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेत.

            ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत ‘स्तर 4’ चे निर्बंध जिल्ह्यात दिनांक 7 जून पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. यापूर्वी लागू असलेले निर्बंध 6 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिनांक 7 जून पासून लागू असणाऱ्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

            या आदेशात म्हटले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजले पासून ते दिनांक 15 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजलेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडील आदेशान्वये कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदीनुसार त्या त्या जिल्ह्यातील कोवीड बाधीत रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले असून त्या त्या स्तरानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट हा 12.70 टक्के असून ऑक्जिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी 66.65 टक्के इतकी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शासनाकडील आदेशान्वये चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

            त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार दि. 7 जून 2021 रोजी पासून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.

            सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये समाविष्ट असल्याने मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायं. 5 वा. नंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना – सर्व दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना – बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृहे – बंद राहतील. रेस्टॉरंट्स – फक्त पार्सलसेवा, घेवून जाणेसाठी आणि घरपोहोच सेवा सुरू राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग – सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 वा. ते सकाळी 9 वा. पर्यंत सुरू राहतील. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. खाजगी आस्थापना, कार्यालये यांना सुट देणेत आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती, शासकीय कार्यालयेसहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) ही 25 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. खेळ – मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 वा. ते सकाळी 9 वा. पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार बंद राहतील. चित्रिकरण – सोमवार ते शुक्रवार सायं.5 पर्यंत सुरक्षीत आवारणामध्ये (बबल) ज्यात गर्दी होईल असे चित्रिकरण प्रतिबंधीत असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी चित्रिकरण करता येणार नाही. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम, मेळावे – बंद राहतील. लग्नसमारंभ – जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत, अंत्ययात्रा, अंतविध – जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत, बैठका, निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – 50 टक्के क्षमतेसह, बांधकाम – ज्या ठिकाणी कामगारांना राहणेची सोय असेल अशी बांधकाम सुरू राहतील. कृषि व कृषि पूरक सेवा – सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वा पर्यंत सुरू राहतील. ई – कॉमर्स – वस्तू व सेवा – फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई – कॉमर्स सेवा सुरू राहतील. जमावबंदी, संचारबंदी – संचारबंदी, व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर – 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वा. ते दुपारी 4 वा. पर्यंत सुरू राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पूर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरू न करण्याच्या अटीवर सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) – 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील ( प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.), माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक किंवा इतर) प्रवाशआंना लागू असलेल्या सर्व नियमांसह – नियमीत सुरू राहतील. खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांना अंतर जिल्हा प्रवास – नियमीत सुरू राहतील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई-पास बंधनकारक असेल. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधित घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह – 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरून प्रवास करून येणास असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर ( ट्रान्सपोस्ट बबल). उत्पादक घटक -1 – अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक ( अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक, अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2 – सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग ( असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठराविक वेळे शिवाय सुरू करता येत नाहीत ), 3  – राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक, 4 – डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणारे घटक – 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरून प्रवास करून येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून  करणेच्या अटीवर ( ट्रान्सपोर्ट बबल). उत्पादन घटक – इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक यामध्ये अंतर्भूत नसणारे सर्व उत्पादन घटक – 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहणेची सोय असलेली किंवा कामाच्या ठिकाणा जवळ स्वतंत्र कॉलनीमध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी, बाहेरून येणाऱ्या जास्तीत जास्त 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्यासह.

            सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना – अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 4 वा पर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायं. 5 वा. नंतर हालचाल, प्रवास करणेस परवानगी असणार नाही. जेंव्हा जेंव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे. त्यावळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तिक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड – 19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.

            अत्यावश्यक सेवामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल – रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यलये, औषध दुकाने, औषध निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे त्यांना सहाय्यभूत कच्चा माल उद्योग आणि अनुषांगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल. शासकीय व खासगी पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप, वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज, विमानचलन आणि संबंधित सेवा( विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल दुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने ( चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने, तसेच दि. 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा. सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था. दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती, देखभाल विषयक बाबी. मालाची / वस्तुंची वाहतूक. पाणीपुरवठा विषयक सेवा. शेती संबंधीत सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडीत सुरू राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पूरक सेवा जसे की, बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज. सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात. ई कॉमर्स (फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत), मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित.  शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा.  विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा. ATM’s. पोस्टल सेवा. बंदरे आणि त्या अनुषंगीक सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तिक व संस्थांसाठी  वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.

            स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा. सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना  – केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था.  सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये. विमा आणि मेडीक्लेम कार्यालये. औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार. सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे. सर्व मायक्रो फायनान्स संस्था. मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरू असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता / वकिल यांची  कार्यालये सुरु राहतील.

            सदरचा आदेश हा दिनांक 07 जून, 2021  पासून शासनाकडील पुढील आदेश होईतोपर्यंत अंमलात राहील. उपरोक्त प्रमाणे सुट देण्यात आलेल्या बाबी, आस्थापना, नागरिक यांनी शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले कोविड-19 वर्तनुकीचे, शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती, आस्थापना, घटक या कोविड-19 वर्तनुकीचे, शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापूर्वी निर्ममित करणेत आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोविड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल.

            या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − twelve =