You are currently viewing ‘अनलॉक’चा गोंधळ संपला!

‘अनलॉक’चा गोंधळ संपला!

७ जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात “अनलॉक” होणार

मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध

राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून ७ जून पासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकारने म्हटलं होतं. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही झाली.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्याचंही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्याचं सरकारने म्हटलं होतं. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचं सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. पण, या गोंधळावरून सरकार टीकेचं धनी ठरलं. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी

पहिला गट

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहे.

कोणत्या गटात काय सुरू होणार?

पहिला गट:-

या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.

दुसरा गट :-

या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.

तिसऱ्या गटामध्ये:-

सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.

चौथ्या गटामध्ये:-

अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर ५व्या गटातमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. ३, ४ आणि ५ या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =