You are currently viewing “राजकारण थांबवा”…मा.नितीनजी गडकरी

“राजकारण थांबवा”…मा.नितीनजी गडकरी

राजकारण हा शेवटचा अड्डा आहे…आणि बहुतांशी हे खरंही आहे. देशातील सत्ताकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे. निदान कोरोनासारख्या महामारीने अवघ्या भारत वर्षातील जनता त्रस्त असताना, कुटुंबाची कुटुंब उध्वस्त होत असताना जो आज राजकीय खेळ सुरू आहे तो पाहिला की आपल्या देशात लोकशाहीच्या गोंडस नावाखाली जे काही चाललयं ते अतिशय चिंताजनक आहे. जे काही विद्यमान स्थितीत कोरोनाच्या बाबतीत चाललय त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याची जाणीव असणारी मा.गडकरी साहेबांसारखे संवेदनशील नेते आहेत ही आम्हा सर्वसामान्यासाठी अतिशय दिलासादायक गोष्ट आहे. त्यांनी काल मिडियासमोर जी खदखद व्यक्त केली आणि परिस्थितीचं गांभीर्य काही आततायी नेत्यांच्या लक्षात आणून दिल..त्यामुळेच मी याबाबतीत समाजमाध्यमातून व्यक्त होत आहे. मी गडकरींचा “अंधभक्त”नाही पण त्यांच्यातील माणूसकीचा आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाचा निश्चितच भक्त आहे. जे डोळ्यानां दिसत ते बिनधास्तपणे कुणाचीही भिडभाड न ठेवता समाजकल्याण लक्षात ठेवून बोलण्याची हिमंत करणारे गडकरींसारखे नेते हा अपवाद आहे… कारण गडकरीना आता स्वतःसाठी किंवा आपल्या आप्तेष्टांसाठी काहीही मिळवायचं नाही.
तीन दिवसांपूर्वी भाजपाचे रोखठोक खासदार मा.सुब्रमण्यम स्वामी यानी कोरोनाच्या आजच्या परिस्थितीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर याबाबत ठोस निर्णय घेऊन काम करणाऱ्या नितीन गडकरीकडे जबाबदारी द्या. श्री स्वामी यांच्या या विधानाकडेही राजकीय नजरेतून.पहाणे योग्य होणार नाही.. त्यांनी केलेल्या विधानामागे गडकरींच्या राजकारणात राहूनही माणूस म्हणून जपलेल्या अनेक पैंलूमध्ये आहे
काल त्यांनी जे सर्वपक्षीयाना कळकळीचे संबोधन केल त्यावरून एक गोष्ट सुस्पष्ट आहे की जे सत्तेवर आहेत भले केंद्रात असो वा राज्यात. ते या देशाचे विश्वस्त आहेत…आणि त्या विश्वासाला पात्र राहूनच आपण जात, धर्म, पक्ष, पंथ हे सगळं विसरून जनतेचं संरक्षण केल पाहिजे… गांभीर्याने आणि जबाबदारीने वागल पाहिजे. राजकारण म्हणजे येनकेनप्रकारेण फक्त आणि फक्त सत्ता मिळवणे नसून राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण हेच खरं राजकारण आहे. अर्थात आमच्या नेत्यांना हे किती उमजेल, समजेल देव.जाणे… पण यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकारतातही संवेदनशील आणि माणूसकी जपणारी माणसं असतात हे गडकरींच्या बाबतीत पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
मा गडकरींचा तसा अगदीच अल्प सहवास लाभला. ते काही वर्षापूर्वी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष असताना आणि मी भाजपाचा जिल्हा पदाधिकारी असताना तीनचार वेळा त्यांची ग्रेट भेट झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी घालणाऱ्या या नेत्याचा सामाजिक, राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. मला आठवत ,ते अध्यक्ष असताना त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक दौरा लागला होता. बेळणे येथील हाँटेल आशिष मध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा त्यांनी घेतली होती.खरं तर त्यांनी आमची शाळाचं घेतली होती असं म्हणायला हरकत नाही.. सगळ्यांची ओळख परेड झाल्यावर त्यांनी कार्यकर्त्यावर प्रश्नांची अशी काही सरबत्ती केली..कि सगळेचं गोंधळले..त्यांनी पहिला प्रश्न केला कि कितीजणांकडे वही आणि पेन आहे?दुसरा प्रश्न जिल्यात पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गण आणि एकूण ग्रामपंचायती किती.. ज्या मोजक्याच जणानां हे माहीत होत त्यांनी उत्तर दिली…यावेळी गडकरीनी सांगितलेले एक वाक्य मला अजूनही आठवतं..”तुम्ही ज्या जिल्ह्यात पक्षाचं काम करायला निघालातं त्या भागाचा जर तुम्हाला भूगोलचं माहीत नसेल तर मग इतिहास कसा घडवणार?…
ते १९९५ मध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मी भारतीय मजदूर संघाचा जिल्हाध्यक्ष होतो. तेव्हा दोनवेळा मंत्रालयात भेट झाली होती. रस्ते कामगारांच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी मी गेलो होतो.दिलेलं निवेदं सुहास्यवदनाने स्विकारुन तिथल्या तिथ कार्यवाही करताना मी त्यांना अनुभवलय.
मी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ पहातो.संसदेतील संबोधन ऐकली पण कुठेही सत्तेचा माज नाही.. मंत्री पद हे क्षणिक आहे…आपण माणूस म्हणून सदैव आहोत याची जाण असलेले नेते म्हणजे नितीनजी.विरोधी पक्षांबरोबर त्यांचे असलेले सलोख्याच संबंध आणि सहमतीने निर्णय घेण्याची कार्यपद्धती त्यामुळे विरोधकांच्याही गळ्यातले ते ताईत आहेत.विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात त्याना आवर्जून बोलावल जात आणि त्याठिकाणीही आपली विचारधारा बिनधास्तपणे मांडत असतात. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे पारनेरचे मा.आमदार.लंकेश या़चा गडकरींच्या हस्ते सत्कार होता. त्या सत्काराला या कार्यसम्राट आमदारांने दिलेलं उत्तर ही गडकरी़च्या निष्काम सेवेची पोचपावती होती.आमदार लंकेश म्हणाले,”जात,धर्म,पंथ आणि पक्ष विसरून देशाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी मुलभूत सुविधांचं जाळ विणल त्या गडकरींच्य हस्ते माझा सत्कार होतो यासारखा माझ्यासाठी भाग्याचा क्षण नाही”
आपले विरोधक म्हणजे काही पाकिस्तानहून.आलेले नाहीत.. ही सगळी या देशातीलच आपली माणसं आहेत.विचारधारा वेगळी असू शकेल पण आपण सगळे भारतीय आहोत हे समाजमनावर बिंबवण्याचं काम गडकरी करत आहेत.राहुल गांधी,सोनिया गांधी,ठाकरे बंधू,शरद पवार अशा अनेक नेत्याबरोबर राजकारणाच्या पलिकडे सौहार्दाचे संबध ठेवून सहमतीच्याच राजकारणातून विकास साधता येतो हा त्यांचा विश्वास आहे.वैयक्तिक लाभासाठी नेत्यांची भाटगिरी करणाऱ्या आणि होर्डिंग्जवर मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्याना तिटकारा आहे. सत्तेच्या क्षणिक मोहात पडून राजकारणात आपला पाय कधीही घसरू न देता जमीनीवर घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या या नेत्याने हा आदर्श भारतरत्न अटलजींकडून घेतलाय, हे ते अभिमानाने सांगत असतात. या देशातील एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून मा.नितीजींबद्दल मला प्रचंड आदर आणि अभिमान आहे…
Gadkariji Proud of you always.You are the real HERO of our Nation.

…एँड.नकुल पार्सेकर..

संस्थिपक अध्यक्ष, अटल.प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + three =