You are currently viewing नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

*नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

*एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्न*

*विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची; विद्यापीठांना संशोधन समाजोपयोगी करण्यावर भर देण्याचेही आवाहन*

पुणे

आजच्या गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक शैक्षणिक शाखांच्या सीमा ओलांडणारे बहुविषयक शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्ये, नवोन्मेष, चिकित्सक विचार आणि नैतिक मूल्ये आत्मसात करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात (एमआयटी एडीटी) आयोजित ११व्या विद्यारंभ-२६ समारंभात ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती डॉ. विश्वनाथ दा. कराड, महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कार्यकारी संचालक डॉ. विनायक घैसास, प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम संगणन, जैवतंत्रज्ञान, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मात्र, तंत्रज्ञानासोबत नैतिकता, मूल्ये आणि करुणेचा अभाव असल्यास हीच तंत्रज्ञाने विनाशकारी ठरू शकतात. विज्ञानाचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, इतर मानवांच्या विनाशासाठी नव्हे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरासोबत मानवता आणि करुणा जपणे अत्यावश्यक आहे, असेही श्री. वर्मा म्हणाले.

विद्यारंभ समारंभ हा केवळ परिचयाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या युवा लोकसंख्येपैकी एक आहे. या लोकसंख्यात्मक सामर्थ्याचे रूपांतर राष्ट्रनिर्मितीच्या शक्तीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करताना भारताच्या समृद्ध सभ्यतागत मूल्यांशी आणि ज्ञानपरंपरेशी जोडलेले राहणेही आवश्यक आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. नव्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध ज्ञानशाखांमध्ये सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना पारंपरिक चौकटींपलीकडे विचार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण व राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आनंद भालेराव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी याप्रसंगी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम आणि भविष्यातील उद्दिष्टांची माहिती दिली. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना नवोन्मेष व संशोधनावर भर देण्याचेही आवाहन केले.

विश्वशांती प्रार्थना व महाराष्ट्र गीताने सुरुवात, तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश एस. यांनी, तर आभार डॉ. सायली गणकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.

*राष्ट्रीय गरिमा पुरस्कारांचे वितरण*
‘विद्यारंभ-२६’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना ‘राष्ट्रीय गरिमा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये केंद्रीय विद्यापीठ, राजस्थानचे कुलगुरू डॉ. आनंद भालेराव, महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचा समावेश होता.

चौकट
*संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा : राज्यपाल*
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर शिकविण्यासोबतच नवोन्मेष, संशोधन आणि समाजोपयोगी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित करावे. त्यांच्यात सर्जनशीलता, चिकित्सक विचार, नैतिक नेतृत्व आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती विकसित करावी. युवकांनी केवळ रोजगार मिळविण्याची आकांक्षा न बाळगता नवोन्मेषक, उद्योजक, संशोधक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारे बनण्याची आकांक्षा ठेवावी. उच्च शिक्षणात उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारीला महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. वर्मा यांनी व्यक्त केली.

*चौकट*
*एमआयटी जबाबदार नागरिक घडविते – प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड*
माईर्स एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आपल्या मनोगतात एमआयटीच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याच्या प्रेरणेतून एमआयटीची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, मूल्ये, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची जोड देऊन सक्षम व जबाबदार नागरिक घडविणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा