*मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश*
*रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या ; मंत्री नितेश राणे*
मुंबई :
कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.
सोमवार दि.११ मे २०२६ रोजी मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते.
“कोकण रेल्वे प्रकल्पासाठी अनेक स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित झाल्यानंतरही त्यांना अद्याप रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नसून याबाबत रेल्वे प्रशासनाने बाधित नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
तसेच रेल्वे स्थानकांवरील स्टॉल वाटप, सुविधा केंद्रे तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये प्रकल्पबाधितांना प्राधान्य देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.
