You are currently viewing लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!

*लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!*

*रविंद्र चव्हाण निष्क्रिय होते तर पालकमंत्री नितेश राणेंकडून राजकोट पुतळा दुर्घटनेची चौकशी लावा*

*शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांचे आ. निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर*

लॉरेन्स उर्फ म्हातु मान्येकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जसे विजय केनवडेकर यांनी निलेश राणेंसोबत काम केले होते तसेच काम लॉरेन्स मान्येकर यांनी सुद्धा निलेश राणेंसोबत राहून केले होते. त्याचे फोटो आणि पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. आज जरी लॉरेन्स मान्येकर हे निलेश राणेंच्या पक्षात नसले तरी त्यांचे वडिल नारायण राणे यांच्या भाजप पक्षाचे लॉरेन्स मान्येकर हे पदाधिकारी आहेत. निलेश राणेंच्या म्हणण्याप्रमाणे जर लॉरेन्स मान्येकर हिंदुविरोधी असतील तर निलेश राणेंनी वडील नारायण राणे यांना सांगून लॉरेन्स मान्येकर यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करून दाखवावी अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांनी केली आहे.

वैभव नाईक पुढे म्हणाले, निलेश राणे जी टीका करतात त्याच्यावर ते ठाम नसतात हे कालच्या त्यांच्या दोन्ही व्हिडिओ वरून दिसून येते. पहिल्या व्हिडिओत निलेश राणेंनी लॉरेन्स मान्येकर यांच्यावर ठेकेदारीवरून आरोप करताना म्हातार्‍याला घरी बसवा, त्यांचा बंदोबस्त करा अशी धमकी दिली. आणि दुसऱ्या व्हिडिओत लॉरेन्स मान्येकर हे हिंदू धर्मविरोधी असल्याचा आरोप केला आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कोसळले तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन पुतळा उभारावा लागला. त्यावेळी देखील निलेश राणेंनी माझ्यावर आरोप केले होते परंतु त्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नव्हते. निलेश राणेंच्या म्हणण्याप्रमाणे जर रवींद्र चव्हाण निष्क्रिय पालकमंत्री होते त्यांनी माझ्या विरोधात चौकशी केली नसेल तर निलेश राणेंचे भाऊ नितेश राणे आता पालकमंत्री आहेत त्यांच्यामार्फत निलेश राणेंनी पुतळा दुर्घटना प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे मी त्यांना आव्हान देतो. परंतु निलेश राणेंमध्ये तेवढी हिम्मत नाही. केवळ आरोप करायचे आणि मूळ मुद्दा दुसरीकडे भरकटवायचा एवढेच काम निलेश राणे करीत आहेत. मी रवींद्र चव्हाण, उदय सामंत, आणि मुख्यमंत्री यांची विविध विषयांवर भेट घेत असतो जिल्ह्यातील अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शिंदे गटाचे पदाधिकारी माझ्या संपर्कात असतात आणि मी देखील त्यांच्या संपर्कात असतो परंतु माझ्या पक्षाची भूमिका आणि माझी भूमिका कायम ठाम असते हे लोकांना माहित आहे. परंतु मी इतर नेत्यांना भेटतो म्हणून निलेश राणेंच्या पोटात का दुखते निलेश राणे यांना उद्धवजींना भेटायचे असेल तर वाटल्यास मी त्यांची भेट घालून देतो त्यांना भेटून माझ्याबद्दल जी काही वस्तुस्थिती सांगायची आहे ती सांगा. आज मी आमदार नाही आहे माझा आठ हजार मतांनी पराभव झाला हे मी स्वीकारले आहे. हा पराभव आर्थिक दृष्ट्या झाला हे पण लोकांना माहिती आहे. आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे निलेश राणे विजयी झाले हे ते नाकारू शकत नाहीत. आता निलेश राणे आमदार होऊन दीड वर्ष झाले आहे आता माझ्यावर आरोप करण्यापेक्षा निलेश राणेंनी जिल्ह्यातील प्रश्न सोडवले पाहिजेत. एलईडी मच्छीमारी ट्रॉलर्सनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारी दुष्काळात सापडली आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे एकही काम पूर्ण झालेले नाही. आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आमच्या कारकिर्दीत अथक प्रयत्न करून आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज , महिला बाल रुग्णालय सुरु केले. परंतु आता शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्याठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठी निलेश राणेंचे पीए व सहकारी पैसे घेतात याचे पुरावे माझ्याकडे आहेत काही दिवसात मी ते उघड करेन. कुडाळच्या महिला बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला येतात तेव्हा डॉक्टर उपलब्ध नसतात. जिल्ह्यातील वाळूचे लिलाव झालेले नाहीत. कुडाळ मतदारसंघातील अनेक रस्ते ठेकेदारांनी खोदून ठेवलेले आहेत आता पावसाळा जवळ आल्याने हे रस्ते अर्धवट ठेवले जाणार आहेत याकडे निलेश राणेंनी लक्ष दिले पाहिजे. निलेश राणेंनी माझ्या विरोधात विधानसभेत आणि मंत्र्यांकडे आरोप केले. त्यांना वाटते की ते स्वतः चांगले बोलतात परंतु त्यांना कोणी मंत्री अथवा जनता गांभीर्याने घेत नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असल्यामुळे लोक त्यांचे ऐकून घेतात. हे वर्षभरात सर्वांना कळून चुकले आहे. निलेश राणे यांनी लॉरेन्स मान्येकर यांना धमकी दिली. विजय केनवडेकर यांच्या घरात घुसले. निलेश राणे जे चुकीचे करत आहेत ते आम्ही लोकांना दाखवून देणार किंबहुना विरोधक म्हणून ते आमचे काम आहे. निलेश राणेंनी माझ्यावर केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मी कोणा ठेकेदाराकडून पैसे घेतले असतील किंवा राजकोट येथील पुतळा दुर्घटनेची कधीही चौकशी करा असे आव्हान वैभव नाईक यांनी निलेश राणेंना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा