*जन्मशताब्दी निमित्त साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव व र. ग. खटखटे ग्रंथालयाचा वर्षभर सुरू आहे उपक्रम*
वेंगुर्ला :
सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर चालू असलेल्या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेचा समारोप *रविवार दि.६ जुलै* रोजी *संध्याकाळी ४.३० वाजता* कै.जयवंत दळवी यांच्या *आरवली येथील जन्मस्थानी* होणार आहे.
समारोपाच्या या चर्चेस सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेत आतापर्यंत लोक आणि लौकिक, अभिनेता, अंधाऱ्याच्या पारंब्या,घर कौलारू, जळातील मासा,चक्र,उपहास कथा,वेडगळ,अथांग,सोहळा, एदीन, निराळा, जयवंत दळवींचा विनोदनामा,मिशी उतरून देईन, साहित्यिक गप्पा,परममित्र, अधांतरी, धर्मानंद, बाजार, अतृप्त,श्रीमंगलमूर्ती आणि कंपनी, सावित्री,सूर्यास्त,सारे प्रवासी घडीचे, कालचक्र,निवडक ठणठणपाळ, नातीगोती, अलाणे-फलाणे आणि भंडाऱ्याचे हॉटेल या एकोणतीस पुस्तकांवर चर्चा करण्यात आली आहे. कै.जयवंत दळवी यांच्या जन्मस्थानी होणाऱ्या ‘आत्मचरित्राऐवजी’ या गाजलेल्या पुस्तकावरील चर्चेने या मालिकेचा समारोप होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा व शिरोडा येथील खटखटे ग्रंथालय या दोनच संस्थांनी कै.जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी दळवींच्या एकूण सत्तर पुस्तकांपैकी तीस पुस्तकांवर चर्चा करून नाविन्यपूर्णरित्या वर्षभर साजरी केली.
तरी या सांगता कार्यक्रमास आपण जरूर उपस्थित रहावे अशी विनंती विनय सौदागर -समन्वयक साहित्य प्रेरणा,आजगाव, श्री.सचिन दळवी-दळवी कुटुंबिय, आरवली, श्री.सचिन गावडे-कार्यवाह खटखटे ग्रंथालय ,शिरोडा यांनी केली आहे.