एखादी व्यक्ती अथवा संस्थेच्या चांगल्या कामासाठी दिले जाणारे प्रोत्साहनपर बक्षीस, गौरव, सन्मान म्हणजे पुरस्कार..!
पुरस्कार देण्याचा उद्देश त्या व्यक्तीचे किंवा संघटनेचे कर्तृत्व आणि कामगिरी गौरवीत करणे. असे पुरस्कार देताना पदक, मानपत्र, ट्रॉफी, रोख रक्कम, शाल, श्रीफळ वगैरे देऊन त्या व्यक्तीचा तिच्या कार्याचा गौरव केला जातो. जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा समाजात त्या व्यक्तीचा मानसन्मान नक्कीच वाढतो..अनेकांच्या नजरेत ती व्यक्ती, संस्था वंदनीय ठरते. परंतु पुरस्कार मिळाला म्हणून कोणी व्यक्ती की संस्था मोठी होत नाही तर ती व्यक्ती मुळातच विशेष असते म्हणून तिला पुरस्कार देऊन गौरव केला जातो. काहीवेळा त्या व्यक्ती अथवा संस्थेमुळे पुरस्कार देखील मोठा होतो हे ही तितकेच खरे..!
पुरस्कार देण्याची निवड पद्धत ही शक्यतो सारखीच असते. मुख्यतः पुरस्कार देण्यासाठी व्यक्ती किंवा संस्थेची शिफारस केली जाते. काहीवेळा वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन त्या त्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींकडून प्रस्ताव मागवले जातात. पुरस्कार देण्यासाठी प्रथम पुरस्कार निवड समिती स्थापित केली जाते. निवड समिती पुरस्कारासाठी निश्चित केलेल्या पात्रता निकषांची तपासणी करते आणि पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्तींची किंवा संस्थेची निवड करते. निवड समितीद्वारे निवडलेल्या व्यक्ती किंवा संस्थेला पुरस्कार प्रदान केला जातो. यामध्ये आणखी एक बाब महत्त्वाची असते ती म्हणजे…
पुरस्कार कोण देतो..?
कोणाला देतात..?
आणि का देतात..?
हे तीन प्रश्न..!
कारण, पुरस्कार देण्याचा कोणाकडे ठेका नसतो, ती कुवत, हिंमत स्वतःच आपल्या मध्ये निर्माण करायची असते.. पुरस्कार घेताना पुरस्कार देणारा त्या क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती अथवा तोलामोलाचा असला पाहिजे, सामाजिक सेवा प्रतिष्ठान असेल तर सामाजिक कार्यात अग्रेसर किंवा त्यांचे बहुमूल्य सामाजिक योगदान असले पाहिजे. ज्या क्षेत्रासाठी पुरस्कार देतात त्या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास असला पाहिजे.. ज्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात त्यांना स्वतःला मान असला तरच तो मानाचा पुरस्कार समजला जाईल.. अन्यथा त्या पुरस्काराला म्हणावी तेवढी किंमतच उरत नाही..
*आजकाल मात्र पुरस्कार म्हणजे एखाद्या देवळात वाटली जाणारी खिरापत झाली आहे.*
(नवसाला फेडलेल्या नारळाचे खोबरे आणि साखर)
दोन अडीजशे रुपये खर्च करून स्थापन झालेल्या काही संस्था वर्षभर समाजोपयोगी कोणतेही काम न करता, कोणताही सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक उपक्रम न घेता, समाजात आर्थिक, सामाजिक मागास कुणालाही केसभर मदत न पुरवता केवळ बुद्धिजीवी समाजात वेगळेपणा दाखवून स्वतःची पत निर्माण करण्यासाठी आपल्या संस्थेच्या नावे पुरस्कार वाटप कार्यक्रम मात्र मोठ्या दिमाखात करतात. एखादा मंत्री, आजी-माजी आमदार पुरस्कार वाटप कार्यक्रमात आणायचा आणि त्याच्याकडून सामाजिक कार्याच्या नावावर बक्कळ पैसा उकळायचा. वर त्या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आणि पुरस्कारांसाठी देखील प्रायोजक शोधायचा किंवा मोठी रक्कम कोण्या दात्याकडून त्याच्या आज्या पंजाच्या नावे स्वीकारून आपल्या संस्थेतर्फे त्याच्या नावाने पुरस्कार द्यायचा. उद्देश केवळ संस्थेचे नाव पुढे आले पाहिजे, या नावाची संस्था आहे हे लोकांना ज्ञात असावे आणि आपण फेटे बांधून मिरवलं पाहिजे, पेपरात गाजावाजा झालाच पाहिजे..एवढीच माफक (?) इच्छा असते.
काही पुरस्कार वाटपकर्ते तर कहर करू लागले आहेत. त्यांच्या संस्थेत पुरस्कार निवड समिती असते..परंतु त्यातील काही चळवळ करणारे.. म्हणजे सगळीकडे चुळबूळ करणारे कार्यकर्ते असतात, तेच ठरवतात कोणाला पुरस्कार द्यायचा. मग त्यांच्या मर्जीतील माणसे शोधली जातात. बरं हे सगळीकडच्या पुरस्काराचे लाभार्थी आणि पुरस्कार देणाऱ्या समितीतील लोकांची नावे पाहिली की ध्यानात येतेच. त्यांना गाठून पुरस्कारासाठी प्रस्ताव देण्याची सूचना केली जाते. स्वतःच त्यांची कागदपत्रे गोळा करतात..आणि शेवटी….
पुरस्कार देण्यासाठी संस्थेला काहीतरी आर्थिक मदत (घूस) देण्याचेही “दबक्या आवाजात” सांगून जातात. त्यासाठी प्रस्तावासोबत एखाद दुसरा कागद नसला तरी चालतो पण “गांधींचा फोटो असलेला हरित कागद मात्र महत्त्वाचा ठरतो..”
एवढ्यावरच त्यांचं समाधान होईल का..? आपल्या मर्जीतील माणसे, शेजारी पाजारी, रोजच्या संपर्कातील माणसे सुद्धा असतातच..
..आणि आपण नामानिराळे राहून कार्यकारिणीतील सदस्य आपल्याच घरातील माणसांना देखील घरच्या घरी पुरस्कार देऊन मोकळे होतात..
हास्यास्पद असते..पण, त्या संस्थेच्या पुरस्कारांची किंमत किती..?
हे स्वतःच जगाला दाखवून देतात. तिथेच “पुरस्कार” या शब्दाची आणि पुरस्कार वाटपाचीच जणू नग्न करून धिंड निघ.. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण..,
“त्यामुळे पुरस्कार योग्य असलेल्या गुणवंतांवर अन्याय केला जातो.. जणू, पुरस्काराचे सुद्धा शोषण केले जाते…वर्षानुवर्षे गरिबांचे केले म्हणतात तसेच..!”
मांजरीने डोळे झाकून दूध पिले तरी पाहणारे आंधळे नसतात ना..!
समाज डोळस असतो, तो केवळ बोलत नाही.. त्यांच्या दुष्कृत्यावर चारचौघात हसतो, त्यांची कीव करतो आणि आपल्या मनात त्यांची एक वेगळी जागा ठरवून ठेवतो..कुठेतरी अडगळीत..कोनाड्यात खितपत पडलेली..
“हम करे सो कायदा” अशी परिस्थिती असते त्या संस्थेत मात्र काहीजणांचा कंपू एकत्रितपणे काही नावे ठरवतो, त्यावर घ्यायची म्हणून इतरांची मते घेतो आणि स्वतःच पुरस्कारांची घोषणा करतो. अशा काही बाबींमध्ये बऱ्याचदा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तिलाही आपल्याला पुरस्कार मिळतो आहे आणि का मिळतो आहे..? याची कल्पना सुद्धा नसते…आनंददायी असते त्यांच्यासाठी..पण, एकाधिकारशाहीचे गालबोट लागते..
काही पुरस्कार असतात मानाचे..
हो, अगदी मानाचेच..
जसे की, कोकणातील व्यक्तीला फलाना फलाना भागात एवढंच नव्हे तर आंध्र, मध्यप्रदेशात पुरस्कार..!
“गावात नाय किंमत आणि दिल्लीत करतात गंमत..”
अरे, गेलीय का कधी ती व्यक्ती आंध्रात..? कोण ओळखतंय का तिला फलाना, फलाना प्रदेशात..?
नाही ना..!
तरीही पुरस्कार जाहीर..!
गंमतच आहे ना..! यात काही जादू नसते..
तो पुरस्कार म्हणजे विकत घेतलेलाच..!
प्रस्ताव दिलेल्या त्या व्यक्तीने फक्त त्यांची अट मान्य करायची…
पुरस्काराच्या बदल्यात पुरस्कार सोहळ्याचा होणारा मंडप खर्च, जलपान, जेवणखाण खर्च उचलायचा..
मिळणार काय…?
स्टेजवर चार पाचशे लोकांच्या समोर (त्यांना जेवणावळ तुम्हीच घालणार) मानाचा फेटा, तलवार, मानपत्र..आणि नारळ (कदाचित पाणी आटलेलाच)…!
मग काय..? आपणच लावायचे बॅनर गावभर… अमुकाला तमुक राज्यात, प्रदेशात अमुकतमुक पुरस्कार प्रदान..! छापून आणायच्या बातम्या आणि फोटो पैसे देऊन पेपरात.. मिरवायचं उगाच आपल्याच गेलेल्या पैशात, हसायचं चारचौघात तोऱ्यात अन् आपल्याच मूर्खपणावर हसायचं आपणच घरात एकांतात..!
निवडक पुरस्कार असतात, तिथे नसतो प्रस्ताव, ना वशिल्याला वाव..!
प्रत्येक क्षेत्रातील निवडक व्यक्तींचे कार्य पाहिले जाते आणि एखाद उत्तम व्यक्तिमत्वाची निवड केली जाते. पुरस्कार सोहळ्यात मानपत्राचं वाचन केलं जातं..आणि सन्मानाने मुख्य अतिथी अथवा सोहळ्याच्या अध्यक्षांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होते.. कार्यक्रम संस्मरणीय ठरतो.
पण…, कित्येकदा पुरस्कार देताना व्यासपीठावर उपस्थित अतिथी, अध्यक्षांच्या ऐवजी प्रेक्षकांमधून काही मान्यवरांना बोलाविले जाते..(कदाचित कुणाला नाराज करायचं नाही, ही भावना) त्यांच्या हस्ते सत्कार केला जातो, सन्मानपत्र एक देतो, शाल दुसरा घालतो.. अशाने सत्कार सोहळ्याच्या मुख्य अतिथी अथवा अध्यक्षांचा अपमान होतोच..पण, पुरस्कार घेणाऱ्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीने तो प्रदान केला की त्या पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या चेहऱ्याचा आणि सोहळ्याचा रंगच उडून जातो…
सोहळा कोणताही असो त्याची रूपरेषा ठरलेली असावी. व्यासपीठावर कोण बसणार..? कोणाच्या हस्ते सत्कार, पुरस्कार दिला जाणार..? हे ठरलेलं असावं आणि मुख्य म्हणजे सूत्रसंचलन करणारी व्यक्ती कार्यक्रमाचे संपूर्ण ज्ञान असलेली असावी कारण, एखादी चूक सुद्धा तिला लीलया पेलता आली पाहिजे अन्यथा सोहळ्याचा बट्ट्याबोळ ठरलेलाच.!
पुरस्कार हा एखाद्याच्या उभ्या आयुष्यातील कार्याचा गौरव असतो..पुरस्कार माणसाला नव्या उमेदीने अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देतो.
जेव्हा आपण पूर्वी दिलेल्या पुरस्कारांचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आठवतात.. “ययाती” या कादंबरी करिता वि. स. खांडेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) आणि सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ (१९७४) पुरस्कार मिळाला होता..
वि.वा. शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांना (१९८७), विंदा करंदीकर यांना (२००३) आणि भालचंद्र नेमाडे यांना (२०१४) मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
मधु मंगेश कर्णिक पद्मश्री (२००२) आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१८) साली मिळाले होते..
जयवंत दळवी यांच्या नावे मॅजेस्टिक प्रकाशन “जयवंत दळवी स्मृती पुरस्कार” देते.. ना. सी. फडके, गदिमा, ना.धो.महानोर, अशा काही मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार दिले गेले होते…
अशा या पुरस्कारांनी जेव्हा थोर व्यक्तिमत्त्वांचा गौरव होतो तेव्हा पुरस्काराला देखील विशेष महत्त्व प्राप्त होते कारण…,
…..त्या क्षेत्रातील त्यांचे कार्य अजरामर असेच असते…
पुरस्कार हा मिरवायचा नसतो तर त्याने वाढते ती जबाबदारी… इतरांवर तसेच संस्कार करायची.., आपला आदर्श दुसऱ्यांसमोर ठेवायची..आणि स्वतःची तत्व नि व्यक्तिमत्व जपायची..
पुरस्कारातून संस्कार जन्मास यावेत, त्याचा तिरस्कार केला जाऊ नये.!