You are currently viewing ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित…

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित…

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी औरंगाबादमध्ये आज ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकमधून दोन, सेलू येथून एक, पुण्यातून (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरमधून एक अशी पाच आमंत्रणे आली होती. पुण्याच्या ‘सरहद्द’ संस्थेनं फेर निमंत्रण पाठवलं होतं. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. मात्र, महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते.

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज स्थळ निश्चितीची घोषणा करण्यात आली.

दिल्लीसाठी होता ‘विशेष’ संमेलनाचा प्रस्ताव, पण…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद्द संस्थेचे निमंत्रक संजय नहार यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी एक ‘विशेष’ साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करील, असं नहार यांना सुचवण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही तसा प्रस्ताव दिला होता. मात्र, संजय नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला, अशी माहिती ठाले-पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + five =