You are currently viewing १०० टन धान्य वाटपातून दान उत्सव

१०० टन धान्य वाटपातून दान उत्सव

स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन

पुण्यातील डॉ.सुनील काळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील 54 संस्थांना धान्याची मदत

मालवण

स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्रातील 54 संस्थांना मिळून 100 टन गहू, धान्यवाटप करून दान उत्सव साजरा करण्यात आला. समाजातील वेगवेगळय़ा घटकांमध्ये अनाथाश्रम, ग्रामीण विकास करणारया संस्था, वृद्धाश्रम, दृष्टीहिन मुलांना स्वत:च्या पायावर उभ्या करणारया संस्था, गतिमंद मुलांना सांभाळणाऱ्या संस्था, गायींचे संगोपन करणार्या संस्था, वनवासी भागात काम करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते.
ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. सुनील शशिकांत काळे यांच्यावतीने हा दान उत्सव दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यासह, बारामती, मुळशी, बीड, नळदुर्ग, सोलापूर, तळेगाव, नारायणपूर, अमरावती, अहमदनगर, वाघोली, राजगुरुनगर, पंढरपूर, आळंदी, वडगाव, पुरंदर, चाकण, जुन्नर, सातारा, जळगाव, जामखेड या भागांतील सामाजिक संस्थांना धान्य 6. देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेले सुनील काळे, मागील 12 वर्षे समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना सहज समजेल, अशा भाषेत प्रबोधन करत आहेत. आयुष्य कसे जगावे, आपली संस्कृती विज्ञानाशी कशी जोडलेली आहे, हे अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालत समाज प्रबोधन करत आहेत. संगीताच्या माध्यमातून परमतत्वाची उकल अगदी सोप्या भाषेत ते करतात. मुंबई, पुणे, बदलापूर, सांगली, कोल्हापूर, कराड, नाशिक, अमरावती, लातूर, जळगाव अशा अनेक ठिकाणी त्यांची 900 हून अधिक प्रवचने झाली आहेत.
हे विश्वम्भरा, समस्त विश्वाचे कल्याण कर! अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो. मात्र, आपल्यावर समाजाचे अनंत ऋण आहेत. समाजासाठी अनेक संस्था प्रामाणिकपणे खूप मोलाचे कार्य करत असतात, त्यांना जरी आपण त्यांच्या कार्यात मदत करू शकलो, तर यासारखे दुसरे मोठे कार्य नाही, असे मत गहूदान करताना डॉ. सुनील काळे यांनी व्यक्त केले. याच विचारधारेतून 2012 साली स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या अंतर्गत धान्यदान, वस्त्रदान, दुग्धदान, ज्ञानदान असे अनेक उपक्रम राबविले जातात. समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत गरजू लोकांना खंबीर आधार आणि बळ देणारया संस्थांशी संपर्क साधून दर वर्षी अन्नदान करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याला जनता जनार्दनाकडून आणि संस्थांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद म्हणून या वर्षाच्या उपक्रमाला महामारीच्या काळात टाळेबंदी असूनही इतके मोठे यश मिळणे ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी (9820281587) या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 8 =