You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेबद्दल त्रिंबक ग्रामस्थांकडून कौतुकोद्गार

आमदार वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेबद्दल त्रिंबक ग्रामस्थांकडून कौतुकोद्गार

*आमदार वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेबद्दल त्रिंबक ग्रामस्थांकडून कौतुकोद्गार*

*त्रिंबक येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी आ. वैभव नाईक यांनी दिला २५ लाख रु. निधी*

*माझ्याकडून जनतेला जे देणे शक्य आहे ते यापुढेही देत राहणारा – आ. वैभव नाईक*

शिवसेना आमदार वैभव नाईक हे आपल्या पक्षप्रमुखाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेची अविरतपणे सेवा करत आहेत. आमदार वैभव नाईक यांचा हाच निर्णय जनतेला भावला आहे. दोन टर्ममध्ये आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यावेळीही मतदार त्यांना भरघोस मतदान करतील आणि ते आमदारकीची हॅट्रिक साधतील, असा विश्वास त्रिंबक येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.
त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराच्या सभा मंडपासाठी नाईक यांनी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी दिला. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादिवशी आ. वैभव नाईक यांनी हजेरी लावली. अधिवेशन सुरू असतानाही ते उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातात असलेल्या इडी, आयकर सारख्या ‘कळसूत्री’ बाहुल्यांचा रिमोटला घाबरून अनेक नेते पक्षांतर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट झाली. यातून राजकारणात निष्ठावान शब्दाची व्याख्या नष्ट होत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. मात्र याला अपवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक हे आहेत. नाईक यांनी ठाकरे कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहणे म्हणजे दोन टर्ममध्ये मतदान केलेल्या सर्व मतदारांशी एकनिष्ठ राहिल्या सारखे आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता एवढ्या अस्थिर राजकारणात नाईक यांची मतदार आणि
पक्षाशी असलेली निष्ठा वाखण्याजोगी आहे, असेही विचार ग्रामस्थांकडून मांडण्यात आले.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, मतदारांना एक रुपयाही न देता मला दोन वेळा जनतेने निवडून देत माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळेच माझा जास्तीत जास्त आमदार निधी प्रत्येक गावाच्या विकासासाठी देत असतो. मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जावू देणार नाही. मला रामेश्वराच्या कृपेने जे जे हवंय ते मिळाले आहे. आपल्या रामेश्वर मंदिराप्रमाणेच मतदार संघातील ५० पेक्षा जास्त मंदिरांच्या विकासासाठी निधी दिला आहे. माझ्याकडून जनतेला जे देणे शक्य आहे ते यापुढेही देत राहणारा आहे असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा