You are currently viewing ‘जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!

‘जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, कोकणरंग प्रतिष्ठान वसई यांचे संयुक्त आयोजन

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मराठीचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत पुन्हा एकदा वक्तृत्व स्पर्धेत अवल स्थान पटकावले असून द्वितीय क्रमांक मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी श्रेया येलपन्नवर तर तर तृतीय पारितोषिक विजेता मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी गौरांग राऊळ ठरला आहे.

आज राज्यभाषा मराठी दिनाच्या गौरव प्रीत्यर्थ सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि कोकणरंग प्रतिष्ठान, वसई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मराठीचा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यां कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे होते तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती कोकणरंग प्रतिष्ठान, वसईचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी व दूरदर्शन आणि आकाशवाणीचे निवेदक राजेश राऊत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघ खजिनदार ॲड. संतोष सावंत, एसपीके महाविद्यालयाचे माजी प्रा. तुषार सावंत, कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सुश्मिता चव्हाण तसेच मुंबई येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते संजय शेटकर यांसह तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, मोहन जाधव, नरेंद्र देशपांडे, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर यांसह मराठी अध्यापक संघाचे राज्य कार्याध्यक्ष भरत गावडे, महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीमाई फुले पुरस्कार विजेत्या शिक्षिका प्रा. सौ. सुषमा मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कोकणरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पा बेलवलकर यांचे ‘जगावे की मरावे..?, हाच एक्ष प्रश्न आहे!’ हे स्वगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ज्येष्ठ पत्रकार व कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठी भाषा ही अलौकिक सौंदर्यप्राप्त भाषा असून मराठी माणसांच्या मनात आदराचे स्थान असणारी भाषा आहे. आज मात्र सोशल मीडियाच्या जगात वाचकांची संख्या कमी होत असून मराठी भाषेला जागतिक दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर वाचकांची संख्या वाढली पाहिजे. तसेच वर्तमानपत्र वाचकांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंत यावेळी श्री. लोंढे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास उपस्थित परीक्षक प्रा. तुषार भाग्यवंत यांनी आपल्या शिक्षकी पेशातील स्वानुभव स्पष्ट करून सावंतवाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे हे आपले माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो. तसेच त्यांच्या कार्याला सलाम ठोकत त्यांनी आपल्या काळात केलेल्या अध्यापनाच्या अनुषंगाने मराठी भाषेचे महत्त्व विशद केले.
यावेळी मंचावर उपस्थित परीक्षक सुष्मिता चव्हाण तसेच सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा देत मराठी भाषेचे महत्व टिकावे यासाठी आवश्यक बाबी स्पष्ट केल्या.

दरम्यान यावेळी घेण्यात आलेल्या ‘मराठीचा जागर.!’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी पार्वतीदेवी हायस्कूलची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकरने पटकावला तर मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी श्रेया अरुण येलपन्नवर हिने द्वितीय तर मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी गौरांग राऊळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, जेष्ठ सदस्य मोहन जाधव, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा