You are currently viewing गिरणी कामगारांच्या घोषणांनी ७ फेब्रुवारी रोजी गिरणगाव दणाणून जाणार

गिरणी कामगारांच्या घोषणांनी ७ फेब्रुवारी रोजी गिरणगाव दणाणून जाणार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : धोकादायक गिरण्यांच्या चाळींची कायद्याप्रमाणे त्वरित पुनर्बाधणी करण्यात यावी आणि पात्रता निश्चिती करणानंतर त्वरित म्हाडा अंतर्गत घरांच्या बांधकामाला गती द्यावी,आदी मागण्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने लालबाग भारतमाता येथे गिरणी कामगारांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, पत्रकार जयश्री खाडिलकर पांडे, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी‌ कामगार युनियननेचे अध्यक्ष जयप्रकाश भिलारे, सेक्रेटरी जयवंत गावडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे तसेच रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, काशिनाथ माटल आदी मान्यवर उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करतील.

 

एनटीसी चाळ रहिवासी कृती समितीचे भाऊसाहेब आंग्रे (दिग्विजय मिल), किरण गावडे (मधुसूदन), महेंद्र‌ हेंद्रे (जाम) तसेच खासगी गिरण्यांच्या रहिवासी कृती समितीचे पदाधिकारी आणि संघाचे संघटन सेक्रेटरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करत आहेत. या प्रसंगी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यात येईल.

 

१ जानेवारी नंतर कामावर असलेल्या कामगारांना एकाच पुराव्यांवर घर मिळाले पाहिजे, पात्रतेसाठीची २४० दिवसाची अट रद्द करा, सोडत लागल्यानंतर ४५ दिवसात घर मिळालेच पाहिजे, गिरणी कामगारांना घरे कमी पडू नये यासाठी सरकारने देऊ केलेली सरकारच्या मालकीची ११० एकर जमीन दिलीच पाहिजे, पंतप्रधान आवास योजनेतील घरे गिरणी कामगारांना द्या, जेथे जेथे रिक्त जागा असेल तेथे गिरणी कामगारांच्या घरांना प्राधान्य द्या, राज्य सरकारने त्वरित कामगार नेत्यांची बैठक बोलावून दोन्ही प्रश्न मार्गी लावावेत अशा मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 7 =