You are currently viewing अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांचे उपक्रम स्तुत्य – युवराज श्रीमंत लखम सावंत-भोसले

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांचे उपक्रम स्तुत्य – युवराज श्रीमंत लखम सावंत-भोसले

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांचे उपक्रम स्तुत्य – युवराज श्रीमंत लखम सावंत-भोसले

सावंतवाडी

आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह आजार होऊच नये यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. कारण संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले यांनी केले.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, चराठा ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने चराठा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी युवराज लखम सावंत भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे परब, चराठा सरपंच सौ प्रचिती कुबल, उपसरपंच अमित परब, गावप्रमुख राजाराम परब, गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, डॉ सरिता कापगते, डॉ त्रिजील के, डॉ चिंतामणी पाटील, डॉ अपर्णा सिद्धे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील परब, ग्रामपंचायत सदस्य गोविंद परब, वृंदा मेस्त्री, गौरी गावडे, सायली दुभाषी, समीर नाईक, सुनिल खानोलकर, राजू कुबल आदी उपस्थित होते.
यावेळी अर्चना घारे परब यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे शाश्वत उपचार असुन अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगून आरोग्य विषयक उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची चराठावासियांना ग्वाही दिली. यावेळी अमित परब यांनी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानची आयुर्वेदिक औषधांची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ प्रशांत ससाणे यांनी आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊच नये यासाठी काम केले जाते. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन केले.
या शिबिरात डॉ प्रशांत ससाणे, डॉ सरिता कापगते, डॉ त्रिजील के, डॉ चिंतामणी पाटील, डॉ अपर्णा सिद्धे यानी हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली. तसेच या शिबिरात काही रुग्णांची मधुमेह तपासणी करून उपचार करण्यात आले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चराठा ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चराठा गावातील २०५ आबालवृद्धांनी लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचे नियोजन चराठा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तारकेश सावंत यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तारकेश सावंत यांनी तर आभार सरपंच सौ प्रचिती कुबल यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा