You are currently viewing निगडी प्राधिकरण येथे पहिले ‘संत साहित्य संमेलन’ संपन्न

निगडी प्राधिकरण येथे पहिले ‘संत साहित्य संमेलन’ संपन्न

प्राधिकरण २६ नोव्हेंबर२०२३ – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

औद्यौगिक नगरीला संत साहित्याची असलेली सांस्कृतिक ओळख वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित पहिले संत साहित्य संमेलन निगडी प्राधिकरणात पार पडले.

प्रभातवेळी वीर सावरकर उद्यानातील सावरकर शिल्पापासून, पाटीदार भवनापर्यंत काढलेल्या, ग्रंथदिंडीत विविध शाळांचे विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, तसेच नागरिक सहभागी झाले होते. गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते अग्नीहोत्र प्रज्वलित करण्यात आले. शंखनाद व रमेश पाचंगे यांच्या मंगलमय चौघडा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अभंगावर आधारित शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाद्वारे स्वागत, साधना नृत्य विद्यालय, चिंचवड यांच्या समुहाने केले.

आपल्या प्रास्ताविकात, मुख्य संयोजिका शर्मिला महाजन यांनी संत साहित्य संमेलन आयोजनात विविध आव्हानांना सामोरे जात केलेला सामना, गेली दोन महिने चाललेली तयारी, तसेच राजाश्रय असा अनोखा संगम राखत आयोजन केले. कार्यक्रमाचे समालोचक श्रीकांत चौगुले यांनी संत साहित्यिक व भारूडकार दिवंगत रामचंद्र देखणे प्रवेशद्वार असे नामकरण केल्याचे सांगितले. चिखली संतपीठातील बाल वारकऱ्यांनी अभंगावर आधारित नृत्यनाटिका सादर केली. त्यांनीच इंग्रजीत संत साहित्याचे धडे दिले. प्रेक्षकांनी त्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला.

संमेलनाध्यक्ष गुरुदेव शंकर अभ्यंकर,स्वागताध्यक्ष महेशदादा लांडगे, तसेच उद्घाटक अमित गावडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांनी संस्कारक्षम पिढी साठी अशा संत साहित्य संमेलनाची गरज असून अशा कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे नमूद केले.

मराठी पत्रकार संघातर्फे महेशदादांचा सत्कार करण्यात आला.गुरुदेवांच्या हस्ते ह.भ.प. किसन महाराज चौधरी गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगतातून सांगितले की, संताचे विचार जीवनात वसंत फुलवितात ,भगवंताचे दर्शन घडवितात अशा संत आणि शिव भूमीत आपण रहात आहोत , आपण खरोखर भाग्यवंत आहोत. कार्यक्रमात संतपीठातील विद्यार्थ्यांचे झालेले सादरीकरण त्याचे फलित आहे.ज्या आई वडीलांनी संत संस्कार माझ्यावर केले त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो.

या संत साहित्य संमेलनात दिवसभर चाललेल्या परिसंवादातून निघालेले काही महत्वाचे निष्कर्ष…

गुरुदेव शंकर अभ्यंकर म्हणाले की, पोशाख ,प्रवचन,किर्तन केले म्हणून कोणी संत होत नाही. ‘तुका म्हणे तोची जगाचे आघात झेली तोची खरा संत ‘संतांनी साहित्य नाही तर वाङ्‍‍मय निर्माण केले , कारण साहित्य अशांत करते तर वाङ्‍‍मय शांत करते सर्व जातीपातीत संत निर्माण झाले. आपापल्या व्यवसायातून जनजागृती करून समाजाचा उद्धार केला.वारकरी व धारकरी शिवाय धर्माचा उद्धार होणार नाही. ज्येष्ठ निरूपणकार व समर्थभक्त समीर लिमये यांनी आपल्या ओघवत्या शैलीत, कथा सीतेची त्या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर या विषयावर विचार मांडताना श्रोत्यांना अंतर्मुख केले. हभप शिरीष महाराज मोरे, युवा प्रवचनकार आपल्या प्रबोधनात विचार मांडले की,

आज सोशल मीडियात महापुरुषांच्या विचारांचे विकृतीकरण करणे.ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद निर्माण करणे,नामदेव, तुकाराम,ज्ञानदेव, चोखोबा अशा विविध संताना जातीमध्ये बांधण्याचे प्रयत्न सध्या चालले आहेत. इतर अनेक चुकीच्या गोष्टी रुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. तुकारामांनी धर्माचे पालन करीत पाखंडाचा विरोध केला म्हणून त्यांना विद्रोही ठरविणे मूर्खपणा आहे.सोशल मीडियात जास्तीत जास्त हिंदूंनी धर्म जागृती करून हिंदू धर्मातील विपर्यास माहीती खोडून सत्य सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त व राम चरित्राचे गाढे अभ्यासक श्री. रविंद्र पाठक यांनी आपल्या प्रवचनात, मनोबोधाची वास्तविकता या विषयावर बोलताना, समर्थ रामदासांनी आखून दिलेल्या मार्गावर अविरत चालत राहणे आणि परमेश्वराचे नाम स्मरणाचे महत्त्व विषद केले.

प. पू. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती (माताजी) यांनी अनंत यातना सोसून, प्रतिकूल परिस्थितीत संतांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा विस्तृत आढावा मांडला.

हजारो लाखोत एखादा संत जन्माला येतो .संत म्हणजे अंत:करणातील उदात्त वृत्ती आहे. दुःखात असलेल्यांना संतांचे विचार फार गरजेचे असतात.

संत आणि ईश्वरामध्ये फरक आहे.संतांनी नास्तिकांना आस्तिक केले. संत वाङ्‍‍मयाची आजच्या काळात खूप गरज आहे. सोशल मीडिया मुळे जग मोबाईलच्या एका क्लिक वर आले असले तरी मन:शांती साठी संतांची गरज लागते.

याप्रसंगी स्थानिक संत साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. मा. माई गटणे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, डॉ.सुनिता जोशी, विजय गाडगीळ, सीमा इनामदार, सुहास कुलकर्णी, दिनकर कुलकर्णी यांचा समावेश होता. डॉ. माधवी महाजन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

वंदना रावलल्लू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या अभंगवाणीचे नेमके निरूपण, अनघा मोडक यांनी केले.

संमेलनाची सांगता सुचेता आडकर यांच्या पसायदानावरील नृत्य सादरीकरणाने झाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अनेक स्थानिक संघटनांचे मोलाचे योगदान लाभले. त्यामध्ये अनुष्का स्त्री मंच, ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी चिंचवड, समर्थ व्यासपीठ पिंपरी चिंचवड, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, रसिक साहित्य मंडळ, गौड ब्राह्मण समाज, स्वामिनी महिला मंडळ, शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी, ब्राह्मण जागृती सेवा संघ यांचा समावेश होता.

या संमेलनाच्या पालखीचे भोई म्हणून डॉ. सचिन बोधनी यांनी विशेष सहकार्य केले. इतरही काही मंडळींनी उस्फूर्तपणे हातभार लावला. त्यात प्रामुख्याने उल्का खळदकर, भारती फरांदे, अनघा कोन्नूर, श्याम परदेशी, सुप्रिया पांडे, अर्चना वर्टीकर, शामल जम्मा, सुरेखा भालेराव, स्नेहल भिंगारकर, सुभाष जोशी, विजयदत्त निमक, मंजिरी सहस्त्रबुद्धे, नरेंद्र चिपळूणकर, सुभाष पाठक, ज्योती कानेटकर आणि चंद्रशेखर जोशी यांचा समावेश होता.

वेळोवेळी विविध उपक्रमांना प्रसिद्धी देणारे पत्रकार बाबू डिसोजा कुमठेकर यांचा देखील प्रातिनिधिक सत्कार संयोजकांनी केला.

या संमेलनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ग्रंथ दालनातून अनेकांनी उपयुक्त ग्रंथ व इतर पुस्तकांची खरेदी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा