You are currently viewing विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात..

विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात..

ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चार गडी गमावून २०१ धावा केल्या आणि विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.

 

या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी साकारली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. स्टीव्ह स्मिथने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरने ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. वॉर्नरने ४१ धावा केल्या. स्मिथ आणि लॅबुशेनने ३६ धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला ४६ आणि लॅबुशेनला २७ धावांवर बाद केले. अॅलेक्स कॅरीला खातेही उघडता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर तंबूमध्ये परतला. १५ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर कुलदीपने मॅक्सवेलला त्रिफळाचीत केले. ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स १५ धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने २८ धावा करत संघाची धावसंख्या १९९ धावांपर्यंत नेली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

२०० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. दोन धावांवर तीन फलंदाज तंबूमध्ये परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. स्टार्कने इशान किशनला तर हेजलवूडने रोहित आणि श्रेयसला आपला बळी बनवले. यानंतर राहुलसह कोहलीने डावाची धुरा सांभाळली. त्याला १२ धावांवर जीवदान मिळाले. यानंतर दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. दोघांनी आपापली अर्धशतकं झळकावली आणि शतकी भागीदारी केली. कोहलीचे शतक हुकले आणि ८५ धावांवर तो हेजलवुडचा तिसरा बळी ठरला. यानंतर राहुलने हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. मात्र, त्याचे शतकही हुकले आणि ९७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने तीन आणि स्टार्कने एक विकेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा