You are currently viewing ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने ७वी मालिका जिंकली; अय्यर-गिल नंतर अश्विन-जडेजाने केली धम्माल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने ७वी मालिका जिंकली; अय्यर-गिल नंतर अश्विन-जडेजाने केली धम्माल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने रविवारी (२४ सप्टेंबर) पावसाने प्रभावित झालेला सामना डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ९९ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेतील भारताचा हा सातवा विजय आहे. भारताने २०२० मध्ये घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंना २-१ ने पराभूत केले होते. मालिकेतील विजयासोबतच भारताने यंदाच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. कांगारू संघाने मार्चमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केला होता. दोन्ही संघांमधील सध्याच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (२७ सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत पाच गडी गमावून ३९९ धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य मिळाले. कांगारूंचा संघ २८.२ षटकांत सर्वबाद २१३ धावांवर आटोपला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या ३८३ धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये बेंगळुरूमध्ये केली होती. त्याचवेळी, एकूण एकदिवसीय सामन्यांमधली ही भारताची सातवी सर्वात मोठी धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या ४१८/५ आहे, जी त्यांनी डिसेंबर २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदूरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारताकडून शुभमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावा, श्रेयस अय्यरने ९० चेंडूत १०५ धावा आणि कर्णधार केएल राहुलने ३८ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा १३ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये २४ चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन बळी घेतले. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉटने ५४ आणि डेव्हिड वॉर्नरने ५३ धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने २७ आणि जोश हेझलवूडने २३ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने १९ आणि अॅलेक्स कॅरीने १४ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट नऊ धावा केल्यानंतर, जोश इंग्लिश सहा धावा केल्यानंतर आणि अॅडम झम्पा पाच धावा करून बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ खातेही उघडू शकला नाही. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला दोन आणि मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.

इंदूरमध्ये भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. येथे भारताचा हा सलग सातवा विजय आहे. २००६ मध्ये भारताने येथे प्रथमच एकदिवसीय सामना खेळला होता. येथे सात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्याचवेळी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा विजय मिळाला. २०१७ मध्ये टीम इंडियाने कांगारूंचा पाच विकेट्सने पराभव केला होता.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यासह विश्वचषकासाठी निवडलेले सर्व खेळाडू उपस्थित राहणार आहेत. विश्वचषक संघाशिवाय रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील उपस्थित राहणार आहेत. दुखापतग्रस्त अक्षर पटेल बरा झाला नाही तर अश्विन किंवा सुंदरची विश्वचषकासाठी निवड होऊ शकते.

दरम्यान, श्रेयस अय्यरला त्याने झळकावलेल्या तडाखेबाज शतकासाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − ten =