नुकसानभरपाई व पीक विम्यासाठी प्रशासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन
सावंतवाडी :
सततच्या पावसामुळे फणसवडे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे केली.
शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना, “लवकरात लवकर नुकसानभरपाई व पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, तर आम्हाला १५ ऑगस्टपासून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संजू परब यांनी या प्रश्नाबाबत तहसीलदारांची तातडीने भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. तसेच, गरज पडल्यास स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्याकडेही हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तातडीने गावात भेट दिल्याबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संजू परब यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी चंद्रकांत गावडे, रामकृष्ण गावडे, प्रभाकर गावडे, विठ्ठल गावडे, शेखर गावडे, आनंद गावडे, प्रकाश गावडे, विलास गावडे, सचिन गावडे आदी फणसवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
