सिंधुदुर्गात पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व; आठपैकी पाच सभापती पदे भाजपकडे
शिवसेनेला तीन तालुक्यांत यश; जिल्हाभर विजयोत्सवाचे वातावरण
सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आठही तालुक्यांतील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडीत भारतीय जनता पक्षाने पाच तालुक्यांमध्ये सभापती पदे मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले, तर शिवसेनेने तीन तालुक्यांमध्ये यश मिळवले आहे.
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांवर कुडाळ येथे मिलिंद नाईक (शिवसेना), मालवण येथे प्रज्ञा चव्हाण (शिवसेना), देवगड येथे गणेश राणे (भाजप), वैभववाडी येथे सिद्धेश रावराणे (भाजप), कणकवली येथे हर्षदा वाळके (भाजप), दोडामार्ग येथे पार्वती गवस (भाजप), सावंतवाडी येथे सुस्मिता जाधव (शिवसेना) आणि वेंगुर्ला येथे शंकर घारे (भाजप) यांची निवड झाली आहे.
कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पट्ट्यात भाजपने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. विशेषतः सिद्धेश रावराणे आणि हर्षदा वाळके यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या भागांत शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मिलिंद नाईक आणि प्रज्ञा चव्हाण यांच्या निवडीमुळे किनारपट्टी भागात शिवसेनेची ताकद अधोरेखित झाली आहे.
नवनियुक्त सभापतींच्या निवडीनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. आता या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील विकासाला किती गती मिळते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
