कणकवलीत विषबाधेचा संशय
सहा जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्याचे साडेतीन लाखांचे नुकसान
कणकवली
कणकवली शहरातील टेबवाडी परिसरात सुपर बाजारच्या मागील शेतात सहा जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी पाच जनावरांचा मृत्यू झाला असून आज सकाळी त्याच परिसरात आणखी एक जनावर मृत अवस्थेत आढळून आले.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीत विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे. मृत जनावरांमध्ये दोन दुधाळ जनावरे, एक रेडा, एक गाभण गाय, एक गाय आणि एक पाडी यांचा समावेश असून एकूण सहा जनावरे दगावली आहेत.
या घटनेमुळे संबंधित शेतकरी राकेश अशोक राणे (रा. फौजदारवाडी) यांचे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या घटनेने शेतकरी राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी पीडित शेतकरी राकेश राणे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेविका आर्या राणे, मेघा सावंत, महेश सावंत, बंडू हर्णे, सुजीत जाधव, बाळू पारकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, आज मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर या सहा जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
