You are currently viewing देवगड जामसांडेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

देवगड जामसांडेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

राष्ट्रवादीचे नेते घाटे यांचे तहसीलदार यांना निवेदन

देवगड

नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा पुरवण्यात याव्या व देवगड जामसंडे शहराला भेडसावणारा पाणी प्रश्नापासून शहरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,देवगड जामसंडे शहराला सध्या टंचाईची झळ बसत आहे. दिवसआड होणारा पाणी पुरवठा आता आठ दिवसातून एकदा होत आहे. सुमारे 40 वर्षापूर्वी शिरगाव पाडागर येथून देवगड जामसंडे शहरासह अन्य गावांना पाणी पुरवठा करणारी योजना झाली. योजनेचे पाईप भिडाचे असल्याने त्याचे खराब होण्याचे प्रमाण कमी आहे. तर सुमारे 23 वर्षापूर्वी दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीवरून पुरक नळयोजना तयार करण्यात आली. मात्र योजनेचे पाईप लोखंडी असल्याने वारंवार गळती होत असते. पंपही तत्कालीन ग्रामपंचायत काळातील असून दुरूस्त करून वापरले जात आहेत. नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा पुरवण्यात यावी.अलीकडील काही वर्षात लोकवस्ती वाढली. घरांची निवासी संकुलांची संख्याही वाढली. त्यामुळे योजनेचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी प्रश्‍नाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते. पाऊस पडल्यावर गप्प बसून न राहता पुढील कार्यवाही सुरू ठेवली पाहिजे. पाण्यामध्ये राजकारण आणले जावू नये. त्यामुळे तत्कालीन स्थितीत येथील आमदार भाजपचा असूनही तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दहिबांव अन्नपूर्णा नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यालाही आता सुमारे 15 वर्षे उलटून गेली. त्यानंतर अद्याप एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्याचे काम झालेले नाही. पाऊस पडणे सरकारच्या किंवा आपल्या नाही तर निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गंभीर बाब विचारात घेता प्रशासकीय पातळीवर हालचाली व्हाव्यात अशी नागरिकांच्यावतीने आमची मागणी आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर,उदय रूमडे,कृष्णा परब, जयराम कदम,सुधीर देवगडकर,ज्ञानदेव भडसाळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा