You are currently viewing राजस्थानचा सहा गडी राखून पराभव; यशस्वी जैस्वालचे शतक व्यर्थ; मुंबई संघाची कर्णधाराला खास वाढदिवस भेट

राजस्थानचा सहा गडी राखून पराभव; यशस्वी जैस्वालचे शतक व्यर्थ; मुंबई संघाची कर्णधाराला खास वाढदिवस भेट

*राजस्थानचा सहा गडी राखून पराभव; यशस्वी जैस्वालचे शतक व्यर्थ; मुंबई संघाची कर्णधाराला खास वाढदिवस भेट*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ४२ व्या सामन्यात तसेच आजवरच्या आयपीएलच्या १००० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा सहा गडी राखून पराभव केला आणि या मोसमात चौथा विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने सात गडी गमावून २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २०व्या षटकातील तीन चेंडूत तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५५ धावा केल्या. त्यांच्याशिवाय टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४ धावा केल्या.

या सामन्यात वानखेडे मैदानावर मुंबईने सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला. आयपीएलमध्ये सर्वात मोठा धावांचा पाठलाग राजस्थान संघाने २०२० मध्ये पंजाबविरुद्ध केला होता. या सामन्यात राजस्थानला २२४ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत शानदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या सलामीच्या जोडीने पाच षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरप्लेनंतर राजस्थानची धावसंख्या बिनबाद ६५ अशी होती. मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. मात्र, आठव्या षटकात बटलरला पियुष चावलाने बाद केले. त्याने १९ चेंडूत १८ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार सॅमसन काही विशेष करू शकला नाही. तो १० चेंडूत १४ धावा काढून अर्शद खानचा बळी ठरला. यानंतर चावलाने देवदत्त पडिक्कलला आपला दुसरा बळी बनवला. पडिक्कलला केवळ दोन धावा करता आल्या.

या सामन्यात जेसन होल्डरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र तोही नऊ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. शिमरॉन हेटमायरही नऊ चेंडूत आठ धावा करून बाद झाला. त्यानंतर मेरेडिथने ध्रुव जुरेलला दोन धावांवर बाद केले. मात्र, यशस्वी जैस्वालने एका टोकाला चिकटून ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटच्या दोन षटकांतही जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या आणि राजस्थानचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा करू शकला. जैस्वाल तीन चेंडू बाकी असताना बाद झाला, पण संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात त्याला यश आले. या सामन्यात राजस्थाननेही मुंबईविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली. यापूर्वी या संघाने २०२२ मध्ये मुंबईविरुद्ध १९३ धावा केल्या होत्या.

या सामन्यात यशस्वी जैस्वालने राजस्थानसाठी एकट्याने धावा केल्या. त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही, पण स्वबळावर त्याने राजस्थानला २०० धावांच्या पुढे नेले. त्याने ६२ चेंडूत १६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२४ धावा केल्या. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो चौथा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यामध्ये सर्वात पुढे आहे मनीष पांडे, ज्याने वयाच्या १९ व्या वर्षी ही कामगिरी केली. त्याच वेळी, ऋषभ पंतने वयाच्या २० व्या वर्षी आणि देवदत्त पडिक्कलने २० व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा जैस्वाल हा अनकॅप्ड खेळाडू आहे. या सामन्यात त्याने १२४ धावा केल्या. त्याच्याआधी पॉल व्हॅल्थाटीने २०११ मध्ये नाबाद १२० धावा केल्या होत्या. त्याचवेळी शॉन मार्शने २००८ मध्ये ११५ आणि मनीष पांडेने २००९ मध्ये नाबाद ११४ धावा केल्या होत्या. बटलरने राजस्थानसाठी संयुक्त-सर्वोच्च धावसंख्याही केली. याआधी बटलरने २०२१ मध्येही या संघासाठी १२४ धावांची खेळी खेळली होती.

या सामन्यात जैस्वालशिवाय अन्य कोणताही फलंदाज राजस्थानसाठी विशेष काही करू शकला नाही. जोस बटलरने १८ धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ संजू सॅमसन (१४) आणि जेसन होल्डर (११) हे दुहेरी आकडा पार करू शकले. मुंबईकडून अर्शद खानने तीन आणि पियुष चावलाने दोन बळी घेतले. त्याचवेळी जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

२१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात काही खास नव्हती. कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या दिवशी तीन धावा करून संदीप शर्माने त्रिफळाचीत केले. संदीपने त्याला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले. यानंतर कॅमेरून ग्रीन आणि ईशान किशनने वेगवान धावा केल्या. दोघांनी मिळून पॉवरप्ले संपेपर्यंत मुंबईची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात ५८ पर्यंत नेली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावा केल्या. इशान किशन २८ धावा करून अश्विनचा बळी ठरला. किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने ग्रीनसोबत मिळून झटपट धावा काढल्या. अश्विनने ग्रीनला ४४ धावांवर बाद केले, हा त्याचा सामन्यातील दुसरा आणि टी२० कारकिर्दी मधील ३०० वा बळी ठरला. त्यावेळी मुंबईची धावसंख्या ११ षटकांत ३ बाद १०१ धावा होती. यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्मासोबत शानदार भागीदारी करत मुंबईची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. यानंतर सूर्याही २९ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. बोल्टच्या चेंडूवर संदीप शर्माने त्याचा अप्रतिम झेल टिपला. आता मुंबईला विजय मिळवून देण्याची जबाबदारी तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडवर होती. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत १८ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या १८१ धावांपर्यंत पोहोचवली. मुंबईला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ३२ धावांची गरज होती. संदीप शर्माने १९व्या षटकात १५ धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात मुंबईला १७ धावांची गरज होती. जेसन होल्डरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर टीम डेव्हिडने तीन षटकार खेचून मुंबईला तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ तर टिळकने २१ चेंडूत २९ धावा केल्या. राजस्थानकडून अश्विनने दोन बळी घेतले. बोल्ट आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून १० वर्षे पूर्ण केल्याबद्दल रोहित शर्माचे रविवारी पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्स खेळाडू आणि कोचिंग स्टाफने कौतुक केले. २४ एप्रिल २०१३ रोजी रोहितकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली संघ २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनला.

यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eight =