You are currently viewing नगरपंचायतीच्या त्या दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

नगरपंचायतीच्या त्या दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

दुकानाला लागलेली आग ही नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबामुळेच आटोक्यात

कणकवली
कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबात आगीच्या दुर्घटनेवेळी पाणी नव्हते ही वस्तुस्थिती आहे. मात्र या प्रकरणी दोषी असणार्‍या नगरपंचायत कर्मचार्‍यांवर आम्ही कारवाई करणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज स्पष्ट केले. तसेच बंब घटनास्थळी उशिरा पोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही ते म्हणाले
समीर नलावडे यांनी आज नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, किशोर राणे, संदीप नलावडे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, आगीच्या घटनेनंतर नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी पोचला. पण त्यात पाणी कमी होते. त्यानंतर आम्ही तातडीने दिलीप बिल्डकॉन कंपनीशी बोलून त्यांचा टँकर मागवला. या टँकरमधील पाणी बंबात घेतले आणि तातडीने आग आटोक्यात आणली. दुकानाला लागलेली आग ही नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबामुळेच आटोक्यात आली ही वस्तुस्थिती आहे. मात्र बंबांत पाणी कमी असणे आणि बंब उशिरा पोचणे याबाबत आम्ही दिलगिरी आहोत.
ते म्हणाले, बंबात पाणी कमी ठेवल्याबद्दल संबंधित दोषींवर निश्‍चितपणे कारवाई होणार आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठीही सज्जता ठेवली जाणार आहे. यापुढे अग्निशामक बंब रजिस्टर मेंटेन केले जाईल. बंबामध्ये पाणी, डिझेल किती यांची रोज तपासणी होईल. ही सर्व जबाबदारी मी स्वत: आणि माझे सर्व नगरसेवक घेणार आहेत. शहरातील बाणे यांच्या दुकानाला आग लागली तेव्हा मी पुण्याला कौटुंबिक कार्यक्रमाला होतो. मात्र या घटनेनंतर तातडीने उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना माहिती दिली. त्यानंतर या सर्वांनी तातडीने हालचाली केल्या. भाजप कार्यकर्त्यांनीही आग विझविण्यासाठी मेहनत घेतल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =