You are currently viewing आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच – निलेश राणे

आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच – निलेश राणे

भारतीय जनता युवा मोर्चा शहर युवक संवाद मेळावा…

मालवण

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. संधी प्रत्येकाला मिळते. मात्र प्रामाणिक कामातून प्रत्येकाने यश मिळवले पाहिजे. आगामी २०२४ मध्ये लोकसभा आणि राज्यतातील सर्व निवडणुकीत भाजप जिंकेलच. मात्र तुम्हा युवकांचे त्या विजयात योगदान किती हे महत्वाचे आहे. त्यासाठी ध्येय वेडे होऊन काम करा. जनतेची सेवा करा. असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केले.

आगामी मालवण पालिका निवडणुकीत गुलाल फटाके भाजपचेच असणार. सर्व निवडणुकीत १०० टक्के यश भाजपला मिळणार. वैभव नाईकला जनता घरी बसवणार असे सांगत निलेश राणे यांनी मालवणात दरवर्षी भव्यदिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरवणार असे स्पष्ट केले.

भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा शहर येथील दैवज्ञ भवन सभागृहात झाला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, उद्योजक दीपक परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, अभय कदम, भाई मांजरेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकीत वराडकर, सरचिटणीस निशय पालेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर नेले. आज राणे केंद्रीय राजकारणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखाली देशपातळीवर काम करत आहेत. मात्र त्यांनी जिल्ह्यात या मतदारसंघात काम केले त्याला तोड नाही. यापुढेही मालवण कुडाळसह जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा विकासनिधी आणायचा आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ही पक्षाची संपत्ती आहे. सत्तेची नशा ठाकरेंच्या डोक्यात गेली आणि सत्ता गेली. अहंकार असता नये. आज अनेक पक्षात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली नेतेमंडळी आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे कर्तृत्व आहे.

भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी प्रास्ताविक करत प्रथम देश नंतर पक्ष नंतर मी या भाजप पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करून युवकांनी संघटना अधिक मजबूत करत काम करूया. असे आवाहन केले. तसेच जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडले. या मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
यावेळी शहरातील युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आल्या. निलेश राणे, देवदत्त सामंत यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाबत ललित चव्हाण सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =