You are currently viewing नारायण राणेंमुळेच पारकरांना आतापर्यत पदे मिळाली….

नारायण राणेंमुळेच पारकरांना आतापर्यत पदे मिळाली….

नगराध्यक्ष समीर नलावडेंची टीका

स्वतःची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी मात्र आपल्या सगळ्या सभ्यता गुंडाळून ठेवल्या. माजीमुख्यमंत्री नारायण राणेंमुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद परत आले नाही. पारकर आता ज्या पक्षात आहेत तेथे पारकर यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेले नाही. त्यावरून पारकर यांनी आपली कुवत ओळखावी व नंतरच नारायण राणेंवर टीका करावी. सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने अंगरक्षकासाठी पारकर यांना झटावे लागते. पारकर यांना अंगरक्षकांची गरज काय हा प्रश्न न उलगडणारा आहे? अंगरक्षक घेऊन शायनिंगबाजी करण्यापुरतीच पारकर यांची मर्यादा आहे. सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही हि पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यानी ओळखावी. नारायण राणेंवर टीका करून स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे. सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस, नंतर भाजपा व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले. राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आले. त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी. नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले. अशा कणकवलीतही अस्तित्वं नसणाऱ्या पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःची लाल करण्यातला प्रकार आहेत. नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी नारायण यांची साथ सोडली. पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकरांनी निवडणुकीत करून दिली. गद्दारी चे दुसरे नाव म्हणजे संदेश पारकर असा मेसेज जिल्ह्याभरात गेला व तो मेसेज आजही कायम आहे. त्यामुळेच पारकऱ यांना शिवसेनेकडून पण पद दिले जात नाही. कारण पारकर जास्त काळ कुठल्याच पक्षात राहत नाहीत. त्यामुळे शिवसेनेत ते किती काळ राहतील याचा कुणालाच भरोसा नाही. नितेश राणे यांच्या नखाचीही सर घेऊ शकत नसलेल्या पारकर यांनी त्यांच्यावर आरोप करून आपण स्पर्धेत राहू पाहत आहेत. परंतु नितेश राणे यांचा मागील निवडणुकीतील विजय २८ हजार मताधिक्‍याने झाला. जे कणकवली शहर सांभाळू शकले नाहीत त्यांनी विधानसभेत विजयी उमेदवारावर बोलावे यातूनच यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते. दरवेळी पक्ष बदलायचे व आपल्याला स्वार्थासाठी आपल्या सोबत इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधायचे ही पारकर यांची वृत्ती ओळखल्या मुळेच ते राहत असलेल्या वार्डात ही त्यांचा कार्यकर्ता शिल्लक नाही. नारायण राणेंवर बोलले की आपल्याला राणे विरोधक म्हटले जाईल या भावनेतून पारकर यांची टीका सुरू असते. परंतु त्याच नारायण राणे यांचे पाय चटणाऱ्या पारकर यांनी आपली उरलीसुरली असलेली अब्रू वाचवण्यासाठी राजकीय संन्यास घेण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =