You are currently viewing कर्ली, कालावल खाडीपात्रातील होड्या, रॅम्प उद्धवस्त करा…

कर्ली, कालावल खाडीपात्रातील होड्या, रॅम्प उद्धवस्त करा…

परशुराम उपरकर; तहसिलदारांना कारवाईचे आदेश द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

मालवण

तालुक्यातील कालावल खाडी, मालवण व कुडाळ तालुक्याला लागुन असलेली कालावल, कर्ली खाडी, वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे वाळुचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. या उत्खननाबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत रॅम्प, होड्या उद्धवस्त करण्याबरोबर अनधिकृत वाळू वाहतुकीच्या गाड्या रोखण्यासाठी तहसीलदारांना आदेश द्यावेत अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्रीची वाळु उत्खनन होत आहे. त्याठिकाणी रॅप बांधले आहेत. होडीमध्ये परप्रांतीय कामगारांमार्फत रात्रीची वाळु उत्खनन करुन रात्रभर वाळु भरुन गोवा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहतुक केली जाते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. ही वाळु काढल्यामुळे शासनाचे मोठे महसुली नुकसान होत आहे. यावर पोलिस व महसुल भरारी पथकाने कारवाई करावी. ज्या-ज्या भागात ज्या सर्व्हे नंबरमध्ये रॅप बांधले आहेत. त्यात वाळु उतरुन ठेवण्यास जागा निर्माण केली आहे. सर्व्हे, हिस्सा नंबरच्या या जमिनी व मालकांवर गुन्हे दाखल करुन नोटीस काढण्यास व त्यावर गुन्हे दाखल केल्यास संबंधीत जमीन मालक आपल्या जागेत रॅप बांधण्यास व वाळु वाहतुकीस रस्ते बंद करतील व रस्ता देणार नाहीत. त्यामुळे वाळु उपसा होण्यास निर्बंध येईल.जे परप्रांतीय युपी, बिहार, ओरीसा, आसाम या भागातील एक हजार कामगार मालवणच्या किनारपट्टीवर वास्तव्यास आहेत. त्यांना वाळु उपसा करणार्‍या ठेकेदारांनी आणुन ठेवले आहे. याबाबत मालवण नायब तहसीलदारांशी चर्चा केली असता त्यांनी पोलिस विभागाला या कामगारांना हाकलुन काढण्यासाठी पत्र दिले आहे. त्या कामगारांची आंतरराज्य स्थलांतरीत कामगार कायदा १९७९ अंतर्गत पोलिस ठाण्यातही नोंद झालेली नाही. अशा कामगारांना कोरोना काळात आपल्या जिल्ह्यात ठेऊ नये व त्याना वरील कायद्यांअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारी कामगार अधिकारी व पोलिस यंत्रणेला आपल्याकडुन पत्रव्यवहार व्हावा. त्यांच्यावर तहसीलदारांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.वाळु उपसा करणारे गावातील नागरिकांना त्रास देऊन उद्धट वागणुकीने त्यांना दमदाटीही करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत योग्य ती कारवाई व्हावी. व तहसिलदारांना वाळु भरलेल्या गाड्या पकडण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =