You are currently viewing श्री. प्रकाश परब यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मित्रमंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांमार्फत आठवणींना उजाळा
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

श्री. प्रकाश परब यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मित्रमंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांमार्फत आठवणींना उजाळा

सावंतवाडी :

 

तळवडे येथे श्री. परब यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मित्रमंडळा कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज येथे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी “तळवडे गावच्या विकासात प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी गावात विकासाची गंगा आणली त्यामुळे त्यांच्या स्मृती कधीही कोणाच्या मनातून पुसल्या जाणार नाहीत,” अशी भावना व्यक्त केली. दरम्यान त्यांच्या कार्याचा वसा सुपुत्रासह त्यांचे मित्र मंडळ जपत आहे त्यामुळे भविष्यात सुध्दा त्यांच्या स्वप्नातील अधुरा विकास पूर्ण करुन त्यांना खरा अर्थाने श्रध्दांजली अर्पण करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, अशोक दळवी, राजन पोकळे, नारायण राणे चंद्रकांत कासार, बाळा गावडे, पंकज पेडणेकर, सुरज परब, अनिल जाधव, राजू पै, गणेश परब, बाबली गवंडे, बाळू परब, सुनिल मोरजकर, गुरुप्रसाद गवस, बाबू कुडतरकर, मंगलदास पेडणेकर, आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व प्रकाश परब मित्रमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी केसरकर म्हणाले की, तळवडे गावाच्या विकासात श्री. परब यांचे अमुल्य योगदान आहे. सहकारासोबतच त्यांनी गावात विविध विकासात्मक उपक्रम राबविले आहेत. तर सहकार क्षेत्रात कार्यरत असताना अनेकांच्या हाताला त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. गावातील महिला सक्षमीकरणासाठी सुध्दा त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच्या आठवणही आजही प्रत्येकाच्या मनात रुतून बसल्या आहेत. गावातील ग्रामपंचायती सोबतच विकास सोसायटीची सुध्दा सुसज्ज इमारत त्यांच्यात प्रयत्नातून आणि संकल्पनेतून उभी राहिली आहे.

मात्र त्यांच्या अकाली जाण्याने गावातील विकास कामात पोकळी निर्माण झाली होती. ती भरुन काढण्याची आता गरज आहे. त्यांच्या रुपाने सहकार क्षेत्राला तळवडे गावातील नवा आणि युवा चेहरा विद्याधर परब मिळाले आहेत. ते सुध्दा त्याच्यांत पावलावर पाऊल ठेऊन काम करतील. तर त्यांच्या जाण्यानंतर रखडलेली विकासाची कामे सुध्दा मार्गी लावण्यासाठी सर्वानी प्रयत्न केलेच पाहिजेत श्री. परब यांच्या कार्याचा वसा त्यांच्या मित्रमंडळीकडून जपला जात आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनीच येथील विकासाला चालना देऊन त्यांना खरा अर्थाने श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.

यावेळी त्यांनी श्री. परब यांच्या मित्रमंडळातर्फे संविता आश्रमाला ५० हजार रुपयांची मदत दिली. याप्रसंगी प्रकाश परब मित्रमंडळाच्या वतीने संविता आश्रमाचे प्रमुख संदिप परब, यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निबंध चित्रकला अशा स्पर्धामध्ये प्रथम व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गावातील विद्याय्थार्ना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

तसेच उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुरक्त प्रतिष्ठानच्या सहकार्याने रक्तदान शिबिर सुध्दा भरविण्यात आले होते. यावेळी या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान रक्तदात्यांचा सुध्दा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर तळवडे गावासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदाना सारखे अमुल्य कार्य करण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारा बाबली गवंडे यांना सुध्दा या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 5 =